म.टा. प्रतिनिधी, नागपूर
राज्यातील शिक्षक भरतीसाठी घेतलेल्या अभियोग्यता चाचणीच्या घोषणेला एक वर्ष झाल्यानंतरही अद्याप ती प्रत्यक्षात येत नसल्याने उमेदवार शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. राज्य शासनाच्या या दिरंगाईचा निषेध करण्यासाठी बुधवारी राज्यभरात ट्विटरवरून हा मुद्दा रेटला जाणार आहे. 'परीक्षेला वर्षपूर्ती तरी नाही शिक्षकभरती' या नावाने ट्विटर ट्रेंड तयार करण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी ७ ते १० या वेळेत राज्यभरात या ट्रेंडवर आधारित पोस्टस ट्विटरवर केल्या जाणार आहेत.
२३ जून, २०१७ च्या शासन निर्णयान्वये २४ हजार रिक्त जागांसाठी मागील वर्षी १२ ते २१ डिसेंबरदरम्यान शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली. या परीक्षेसाठी सुमारे १ लाख ९८ हजार विद्यार्थी उपस्थित होते. राज्य सरकारने इच्छुक उमेदवारांची अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. अद्यापही शिक्षक भरतीबाबत शासनाने कोणत्याही हालचाली केलेल्या नाहीत. यामुळे नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या शिक्षक उमेदवारांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण तयार झाले होते.
मागील फेब्रुवारी महिन्यात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी येत्या सहा महिन्यात शिक्षक भरती केली जाईल, असे जाहीर केले जाईल. दिवाळीनंतरच्या सत्रापासून शाळांमध्ये नवे शिक्षक रुजू झालेले दिसतील असेही शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले होते. शिक्षक भरतीची मागणी रेटून धरण्यासाठी बुधवारी १२ डिसेंबर रोजी 'शिक्षकभरती' चा मुद्दा ट्विटरवरून मांडला जाईल. डीटीएड, बी.एड. स्टुडंट्स असोसिएशनच्या वतीने हा ट्विटर ट्रेंड केला जाणार आहे. त्यासाठी 'परीक्षेला वर्षपूर्ती तरी नाही शिक्षकभरती' असा हॅशटॅग तयार करण्यात आला आहे. शासनाने आता शिक्षक भरतीबाबत कोणतीही घोषणा न करता १७ डिसेंबर ही बिंदूनामावलीची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. त्याचप्रमाणे संस्थाचालकांनी घ्यावयाच्या मुलाखतीच्या अधिकाराबाबत सरकारने स्पष्ट निर्देश द्यावेत. तातडीने शिक्षक भरती करून अभियोग्यता धारकांना न्याय दिल्या जावा अशी मागणी असोसिएशनच्यावतीने करण्यात आली आहे.