म.टा. वृत्तसेवा, यवतमाळ
शेतशिवारातील विहिरीत पडून दोन अस्वलांचा मृत्यू झाल्याची घटना महागाव तालुक्यातील नांदगव्हाणजवळ जंगलाजवळ घडली. या घटनेने वनविभागात खळबळ उडाली आहे.
कोठारी येथील शेतकरी शिवाजी संभाजी आढागळे यांचे नांदगाव शिवारात शेत आहे. गुरुवारी सकाळी ते शेतात गेले असता विहिरीतील पाण्यावर दोन अस्वलांचे मृतदेह तरंगत असल्याचे त्यांना आढळून आले. त्यांनी लगेच या घटनेची सूचना वन विभागाला दिली. वनविभागाच्या पथकानेने तातडीने नांदगव्हाण शिवारात पोहोचली. सहाय्यक उप वनसंरक्षक अमोल थोरात, वनपरिक्षेत्र अधिकारी हेमंत उबाळे, क्षेत्र सहाय्यक हक, यांनी कोब्रा अॅडव्हेंचर क्लबचे शेख बादशहा यांच्या मदतीने अस्वलांचे मृतदेह विहिरीबाहेर काढले. पशू वैद्यकिय अधिकारी योगेंद्र येवतीकर यांनी मृत अस्वलांचे घटनास्थळी शवविच्छेदन केले. रात्रीच्या अंधारात दोन्ही अस्वल विहिरीत कोसळले असावेत, असा अंदाज डॉ. येवतीकर यांनी व्यक्त केला. विहिरीच्या आतल्या भागात अस्वलांच्या नखांचे ओरखडे उमटले असल्यामुळे विहीरीत पडल्यानंतर दोन्ही अस्वलांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट होत आहे. पंचनामा आणि शवविच्छेदनानंतर मृत अस्वलांवर अग्नीसंस्कार करण्यात आले. अस्वलांच्या मृत्युमागीन नेमके कारण शोधण्यासाठी त्यांचा व्हिसेरा अमरावती येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती डॉ. येवतीकर यांनी दिली. कोठारी, बेलदरी जंगलात अस्वलांचा मुक्तसंचार असून दोन दिवसांपूर्वीच मादी अस्वलाने शेतमजूर आत्माराम ठाकरे यांच्यावर कोठारी शिवारात प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर गुरुवारी विहिरीत पडून दोन अस्वलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.