म.टा. प्रतिनिधी, नागपूर
सततच्या अवकाळी पावसाला कंटाळलेल्या नागपूरकरांना मध्यंतरी निरभ्र आकाशाने दिलासा दिला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून परत एकदा ढगाळ वातावरण तयार झाले. रविवारी सकाळी काही ठिकाणी तर पावसाच्या हलक्या सरींनी हजेरीसुद्धा लावली. त्यामुळे हा हिवाळा आणि पावसाळा म्हणजेच 'हिवसाळा' कधी एकदाचा संपतो, असा प्रश्न नागपूरकरांना पडला आहे.
मध्यंतरी आकाश निरभ्र झाले. कोरड्या हवामानामुळे पारा घसरून ५.७ अंशांपर्यंत पोहोचला होता. मात्र, गेल्या काही दिवसांत पुन्हा ढगांनी आकाशात गर्दी केली. त्यामुळे आर्द्रता वाढली, थंडी ओसरली. गेल्या पाच दिवसांपासून विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमधील तापमान हे दहा अंशांहून अधिक आहे. त्यामुळे विदर्भातील कोणत्याच भागात थंडीचा कडाका कमी झाल्याचे जाणवले. गेल्या पाच दिवसांपासून विदर्भातील जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण कायम आहे. अद्याप कुठेही अवकाळी पावसाची नोंद झालेली नाही. रविवारी सकाळी आठ ते नऊच्या सुमारास काही ठिकाणी हलक्या सरींनी हजेरी लागली. मात्र, नंतर ढगांच्या उपस्थितीत दिवसभर ऊन-सावलीचा खेळ रंगला. रविवारी विदर्भात गडचिरोली येथे सगळ्यात कमी १०.१ अंश तापमानाची नोंद झाली. अमरावती येथे सर्वाधिक १५.८ अंश किमान तापमानाची नोंद झाली. पुढील काही दिवस हवामानाची ही स्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मंगळवारीसुद्धा हलक्या सरींची शक्यता आहे. मात्र, त्यानंतर पुन्हा शहराचे तापमान १२ अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.
हे आहे पावसाचे कारण
पश्चिमी विक्षोपामुळे हिमालय आणि आसपासच्या परिसरात हिमवृष्टी होते. या हिमवृष्टीचा परिणाम देशातील इतर भागांतील तापमानावर होतो. उत्तरेकडे बर्फवृष्टी झाल्यावर तेथून दक्षिणेकडे वाहणारे थंड आणि कोरडे वारे विदर्भात थंडी आणतात. मात्र, यंदा मान्सूननंतरच्या काळातसुद्धा विदर्भातील हवामानात काही प्रमाणात आर्द्रता होतीच. याला मुख्य कारण हे पश्चिमी विक्षोपाचे वारे यंदा अरबी समुद्रातील काही बाष्प घेऊन येत आहेत. यामुळे अधूनमधून ढगाळ वातावरण तयार होत आहे. त्यामुळे यंदा थंडीची भट्टी म्हणावी तशी जमली नाही, असा अंदाज हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांतर्फे व्यक्त केला जात आहे.