अ‍ॅपशहर

काँग्रेस घाबरतेय तरी का : मधुर भांडारकर

‘इंदू सरकार’ हा चित्रपट ७० टक्के फिक्शन अर्थात काल्पनिक आणि ३० टक्के सत्यपरिस्थिती दर्शवणाऱ्या साहित्यावर आधारित आहे. आणीबाणीच्या काळातील ती परिस्थिती चित्रपटाच्या निमित्ताने जगापुढे येणार असेल तर काँग्रेस का घाबरत आहे’, असा सवाल दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

Maharashtra Times 17 Jul 2017, 4:00 am
म.टा. प्रतिनिधी, नागपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम why congress afraid madhur bhandakar
काँग्रेस घाबरतेय तरी का : मधुर भांडारकर

‘इंदू सरकार’ हा चित्रपट ७० टक्के फिक्शन अर्थात काल्पनिक आणि ३० टक्के सत्यपरिस्थिती दर्शवणाऱ्या साहित्यावर आधारित आहे. आणीबाणीच्या काळातील ती परिस्थिती चित्रपटाच्या निमित्ताने जगापुढे येणार असेल तर काँग्रेस का घाबरत आहे’, असा सवाल दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

आणीबाणीच्या परिस्थितीवर पुस्तके, नाटक आणि इतर साहित्य उपलब्ध आहे. या साहित्य लेखकांना त्याबाबत जाब विचारण्यात आला नाही. मग, आम्हालाच का विचारण्यात येत आहे? तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी नेहमी बोलता मग आम्हाला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य नाही का, असे ट्विट मी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना केल्याचे भांडारकर यांनी यावेळी सांगितले.

काँग्रेसने हा छिचोरपणा बंद करावा. त्यांच्यामुळे आम्हाला प्रत्येक ठिकाणी पोलिस बंदोबस्तात राहावे लागत आहे. त्यांच्या या कृतीमुळे आम्हाला अहमदाबाद, बेंगळुरू येथील पत्रपरिषदा रद्द कराव्या लागल्या आहेत. प्रदर्शनाआधी या लोकांना चित्रपट दाखवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे भांडारकर म्हणाले. सेन्सॉर बोर्डाने आम्हाला १७ कट सुचवले आहेत. आम्हाला ते मान्य नाहीत. आम्ही परत एकदा समितीसमोर जाणार असून काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास ठेवावा. त्यांच्याआधी आम्ही कुणालाही चित्रपट दाखवणार नाही. ज्यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास आहे, त्यांनी हा चित्रपट बघावा. माझे भाजप, काँग्रेस, कम्युनिस्ट नेत्यांशी चांगले संबंध आहेत, असे भांडारकर म्हणाले.

धमक्या येत आहेत

हा पब्लिसिटी स्टंट असल्याचे बोलले जात आहे, पण मला अशा प्रसिद्धीची अजिबात गरज नाही. आम्हाला धमक्या येत असून काळी शाई फेकण्याचा इशारा दिला जात आहे. जो काळी शाई फेकेल त्याला एक लाख रुपयाचा पुरस्कारही जाहीर झाला आहे, असा आरोप मधुर भांडारकर यांनी केला.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन : कीर्ती

काँग्रेस हे जे काही करीत आहे, ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन असल्याचा आरोप अभिनेत्री कीर्ती कुल्हारी हिने केला. आम्हाला पोलिस संरक्षणात फिरावे लागत आहे, हे दुःखद आहे. त्यांनी कायद्याच्या मार्गाने जावे. आमचा चित्रपट ठरलेल्या तारखेलाच प्रदर्शित होईल, असेही कीर्ती यावेळी म्हणाली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज