म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या दिवशी पोलिसांकडून परिवर्तनवादी कार्यकर्त्यांवर दडपशाही करण्यात आली. याउलट महाजनादेश यात्रेत सहभागी मोटरसायकलस्वारांनी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवूनही त्यांच्यावर कारवाई केली गेली नाही. या अन्यायकारक वागणुकीचा समाधानकारक खुलासा करावा, अन्यथा आम्ही न्यायालयीन लढाई लढू असा इशारा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसने जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबतचे निवेदन देण्यात आले. १८ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा नाशिकमध्ये येणार असल्याने १७ सप्टेंबरला दुपारपासूनच पोलिसांनी परिवर्तनवादी कार्यकर्त्यांना घरून ताब्यात घेण्यास सुरुवात केली. काही कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांनाही धमकावण्यात आले. महाजनादेश यात्रेदरम्यान कोणत्याही प्रकारचे आंदोलन करणार नाही अशी ग्वाही देऊनही मला १४९ ची नोटीस देऊन पोलिसांनी ताब्यात घेतल्याची कैफियत आयटकचे राज्य सचिव राजू देसले यांनी या निवेदनातून मांडली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सभेवेळी देखील नजरकैदेत ठेवण्यात आले. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी वागणूक का दिली गेली, असा सवाल परिवर्तनवादी संघटनांनी उपस्थित केला आहे. या दोन दिवसांच्या काळात मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवली गेली. महाजनादेश यात्रेच्या मार्गावरील व्यावसायिकांनाही काही भागात दुकाने बंद ठेवण्यास सांगितल्यामुळे या व्यावसायिकांचे नुकसान झाले. या नुकसानाची भरपाई भारतीय जनता पक्षाने द्यावी. कायदा न पाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. अन्यायकारक वागणुकीबद्दल खुलासा करावा. तो उपलब्ध न झाल्यास न्यायालयीन लढाई लढू असा इशारा देसले यांनी दिला आहे.