म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
प्लॉटमध्ये गुंतवणूक केल्यास तीन वर्षात दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवत धुळे आणि ठाणे जिल्ह्यातील दोघा संशयितांनी ओझर येथील वृद्धास तब्बल ३७ लाख ७५ हजार ८५० रूपयांना चुना लावला. सातत्याने पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्याने फिर्यादीने पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.
या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. फसवणुकीची घटना २०१२ ते २०२० या कालावधीत झाली. या गुन्ह्यात रामदास लक्ष्मण क्षीरसागर (७४, रा. शिंदे लॉन्सजवळ, आग्रारोड, ओझर) यांनी फिर्याद दिली. तर, संजय मुरलीधर कापडणीस (रा. रेणुका कन्स्ट्रक्शन, बळी मंदिर आग्रारोड, मूळ रा. पिंपळनेर, जिल्हा धुळे) आणि निरज दिंगबर चौधरी (रा. शुभवास्तु रेसीडेन्सियल टाउनशिप, वाशिंद, शहापूर, जिल्हा ठाणे) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. कापडणीसने बळी मंदिर परिसरात सुरू केलेल्या रेणुका कन्स्ट्रक्शन या कार्यालयाशी फिर्यादी क्षीरसागर यांचा संपर्क आला होता.
कापडणीस आणि शहापूर येथे शुभवास्तू रेसीडेन्सियल टाउनशिपचे काम पाहणारा बिल्डर चौधरी या दोघांनी मिळून क्षीरसागर यांच्याकडून पैसे उकळले. दोन्ही कंपन्याच्या प्लॉटमध्ये पैसे गुंतविल्यास तीन वर्षात दामदुप्पट पैसे देण्याचे आमिष आरोपींनी दाखवले. त्यामुळे क्षीरसागर यांनी खरेदी दस्त तयार करण्यासाठी वेळोवेळी तब्बल ३७ लाख ७५ हजार ८५० रूपये आरोपींना दिले. संशयित आरोपींनी ही रक्कम फ्लॅट, प्लॉट तसेच शेमजमिनीत गुंतवली. मात्र, तीन वर्षांनंतर एक रूपयांचा परतावा दिला नाही. क्षीरसागर यांनी पाठपुरावा सुरू केला. मात्र, संशयितांनी वेळोवेळी कारणे सांगून क्षीरसागर यांना परत पाठवले. आपली फसवणूक झाल्याची कल्पना आल्याने अखेर क्षीरसागर यांनी भद्रकाली पोलिस ठाणे गाठून हकीगत सांगितली. त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक गिरी करीत आहेत.