म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
राज्य सरकारने 'ब्रेक द चेन'अंतर्गत फक्त अत्यावश्यक सेवा, फार्मा, आयटी कंपन्या आणि निर्यातक्षम उत्पादक कंपन्यांनाच परवानगी दिलेली असली, तरी गुरुवारी मात्र जवळपास ७० टक्के उद्योगक्षेत्र नियमितपणे, परंतु नियम पालनावर भर देत शांततेत सुरू असल्याचे दिसून आले.
राज्य सरकारने यावेळी कठोर निर्बंध घातले नसून, उद्योजकांनी स्वत:हूनच नियम पाळावेत, अशी अपेक्षा एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी 'ब्रेक द चेन'अंतर्गत नव्याने निर्बंध लागू करताना फक्त अत्यावश्यक सेवा, फूड प्रोसेसिंग युनिट, फार्मा, आयटी कंपन्या आणि मालाची ८५ टक्के निर्यात होणारे उद्योगच सुरू राहतील, असे म्हटले होते. याशिवाय ऑटो क्लेव्ह किंवा बॉयलर बंद करण्यासाठीच चार ते पाच दिवस लागत असल्यामुळे अशा कंपन्याही सुरूच राहणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले होते. मात्र, त्याव्यतिरिक्त इतर उद्योगांचे काय, असा संभ्रम उद्योजकांमध्ये होता. त्यावर बुधवारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक आदींनी उद्योजकांशी चर्चा करीत याबाबत स्पष्टीकरण दिले. निर्बंध लागू करताना उद्योग बंद राहतील असे आदेशात म्हटलेले नाही. कंपनीच्या आवारात कामगारांची व्यवस्था करू शकणारे किंवा बसद्वारे कामगारांना कारखान्यात आणू शकणारे उद्योग सुरू राहू शकणार आहेत. परंतु, त्यातही बसमध्ये ५० टक्के क्षमतेनेच वाहतूक करावी लागणार आहे. या निकषांनुसार नाशिकमधील ८० टक्के उद्योग बंदच राहिले असते. कारण, एक-दोन मोठ्या कंपन्या वगळता इतरांकडे कंपनी आवारात कामगारांची राहण्याची व्यवस्था नाही, तसेच मोजक्याच कंपन्यांकडे कामगारांना ने-आण करण्यासाठी बसची सुविधा आहे. परंतु, कामगार उपलब्ध झाल्यास कंपन्यांना ५० टक्के क्षमतेने उत्पादन सुरू ठेवण्यास कुठलाही अडथळा नाही. शिवाय, संचारबंदी लागू असली, तरी कामगारांनी ओळखपत्र दाखविल्यास त्यांना प्रवास करता येणार आहे. त्यामुळे निर्बंध असले, तरी जवळपास ७० टक्के कंपन्यांनी आपले उत्पादन सुरू ठेवले असून, कामगारही नियमितपणे कामावर हजर होत आहेत.
लघुउद्योगांचे कामही नियमित
नाशिकमधील बहुतांश लघुउद्योग मोठ्या ऑटोमोबाइल कंपन्या, एचएएल, एकलहरे येथील विद्युत प्रकल्पांना लहान-मोठे सुटे भाग किंवा सेवा पुरवतात. यातील एचएएल, विद्युत प्रकल्प, फार्मा कंपन्या, तसेच फूड प्रोसेसिंग कंपन्या अत्यावश्यकमध्ये असल्यामुळे त्या सुरू असून, त्यांना सुटे भाग, पूरक सेवा पुरविणाऱ्या कंपन्याही सुरू आहेत. याशिवाय मोठ्या वाहन कंपन्यांनीही आपले उत्पादन सुरू ठेवले असून, त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लघुउद्योगांचे कामही सुरूच आहे.
उद्योगक्षेत्र बंद राहावे असा निर्बंधांचा हेतू नाही, तर करोना रोखण्यासाठी एकमेकांशी संपर्क कमीत कमी व्हावी हा आहे. याबाबत दक्षता घेतल्यास कोणताही उद्योग सुरू राहण्यास हरकत नाही.
-नितीन गवळी, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी
राज्य सरकारने 'ब्रेक द चेन'अंतर्गत फक्त अत्यावश्यक सेवा, फार्मा, आयटी कंपन्या आणि निर्यातक्षम उत्पादक कंपन्यांनाच परवानगी दिलेली असली, तरी गुरुवारी मात्र जवळपास ७० टक्के उद्योगक्षेत्र नियमितपणे, परंतु नियम पालनावर भर देत शांततेत सुरू असल्याचे दिसून आले.
राज्य सरकारने यावेळी कठोर निर्बंध घातले नसून, उद्योजकांनी स्वत:हूनच नियम पाळावेत, अशी अपेक्षा एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी 'ब्रेक द चेन'अंतर्गत नव्याने निर्बंध लागू करताना फक्त अत्यावश्यक सेवा, फूड प्रोसेसिंग युनिट, फार्मा, आयटी कंपन्या आणि मालाची ८५ टक्के निर्यात होणारे उद्योगच सुरू राहतील, असे म्हटले होते. याशिवाय ऑटो क्लेव्ह किंवा बॉयलर बंद करण्यासाठीच चार ते पाच दिवस लागत असल्यामुळे अशा कंपन्याही सुरूच राहणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले होते. मात्र, त्याव्यतिरिक्त इतर उद्योगांचे काय, असा संभ्रम उद्योजकांमध्ये होता. त्यावर बुधवारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक आदींनी उद्योजकांशी चर्चा करीत याबाबत स्पष्टीकरण दिले. निर्बंध लागू करताना उद्योग बंद राहतील असे आदेशात म्हटलेले नाही. कंपनीच्या आवारात कामगारांची व्यवस्था करू शकणारे किंवा बसद्वारे कामगारांना कारखान्यात आणू शकणारे उद्योग सुरू राहू शकणार आहेत. परंतु, त्यातही बसमध्ये ५० टक्के क्षमतेनेच वाहतूक करावी लागणार आहे. या निकषांनुसार नाशिकमधील ८० टक्के उद्योग बंदच राहिले असते. कारण, एक-दोन मोठ्या कंपन्या वगळता इतरांकडे कंपनी आवारात कामगारांची राहण्याची व्यवस्था नाही, तसेच मोजक्याच कंपन्यांकडे कामगारांना ने-आण करण्यासाठी बसची सुविधा आहे. परंतु, कामगार उपलब्ध झाल्यास कंपन्यांना ५० टक्के क्षमतेने उत्पादन सुरू ठेवण्यास कुठलाही अडथळा नाही. शिवाय, संचारबंदी लागू असली, तरी कामगारांनी ओळखपत्र दाखविल्यास त्यांना प्रवास करता येणार आहे. त्यामुळे निर्बंध असले, तरी जवळपास ७० टक्के कंपन्यांनी आपले उत्पादन सुरू ठेवले असून, कामगारही नियमितपणे कामावर हजर होत आहेत.
लघुउद्योगांचे कामही नियमित
नाशिकमधील बहुतांश लघुउद्योग मोठ्या ऑटोमोबाइल कंपन्या, एचएएल, एकलहरे येथील विद्युत प्रकल्पांना लहान-मोठे सुटे भाग किंवा सेवा पुरवतात. यातील एचएएल, विद्युत प्रकल्प, फार्मा कंपन्या, तसेच फूड प्रोसेसिंग कंपन्या अत्यावश्यकमध्ये असल्यामुळे त्या सुरू असून, त्यांना सुटे भाग, पूरक सेवा पुरविणाऱ्या कंपन्याही सुरू आहेत. याशिवाय मोठ्या वाहन कंपन्यांनीही आपले उत्पादन सुरू ठेवले असून, त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लघुउद्योगांचे कामही सुरूच आहे.
उद्योगक्षेत्र बंद राहावे असा निर्बंधांचा हेतू नाही, तर करोना रोखण्यासाठी एकमेकांशी संपर्क कमीत कमी व्हावी हा आहे. याबाबत दक्षता घेतल्यास कोणताही उद्योग सुरू राहण्यास हरकत नाही.
-नितीन गवळी, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी