म. टा. प्रतिनिधी, नाशिक
हिंगणघाट व सिल्लोड येथील महिला अत्याचाराच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (नाशिक महानगर)ने तीव्र निषेध नोंदवत अशोक स्तंभ येथे निदर्शने केली.
महिलांवर होणारे अत्याचार हे महाराष्ट्राला तसेच देशाला भूषणावह नाहीत. अशा घटना समाजात यापुढे घडू नये, यासाठी कायद्याचा जरब बसणे आवश्यक आहे. मुंबई येथे 'नाइट लाइफ'च्या गोष्टी करणारे ठाकरे सरकार मात्र राज्यातील महिला अत्याचारावर गप्प बसले आहे, याचा 'अभाविप' तीव्र निषेध करते. महाराष्ट्राला नाइट लाइफची नाही तर महिला सुरक्षेची गरज आहे. हिंगणघाट जळीतकांड, सिल्लोड येथील अत्याचाराची घटना यांचा जलद तपास करून या गुन्ह्यांचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अभाविप महाराष्ट्र प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे यांनी केली. संघटनेचे जिल्हा संयोजक सागर शेलार, महानगर मंत्री अथर्व कुलकर्णी, महानगर सहमंत्री सिद्धेश खैरनार उपस्थित होते.