म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
मनमाड-मुंबई धावणारी व नाशिककरांसाठी महत्त्वाची असलेली राज्यराणी एक्स्प्रेस आता नांदेडपर्यंत धावणार आहे. रेल्वेमंत्र्यांनी तसे पत्र १६ डिसेंबरला मराठवाड्याच्या खासदारांना लिहिले आहे. म्हणजेच नाशिककरांसाठी सुरू झालेली ही गाडी नांदेडकरांनी पळवली असा आरोप होत आहे. रेल्वेमंत्र्यांच्या निर्णयाविरुद्ध जनआंदोलनाची तयारी सुरू झाली आहे.
मुंबईला हजारो नाशिककर दररोज नोकरी, व्यवसाय निमित्त जातात. त्यांच्यासाठी पंचवटी गाडी सुरू झाली. तिला नेहमी गर्दी असल्याने पंचवटी आधी राज्यराणी सुरू करण्यात आली आहे. तिचा चांगला लाभ होत होता. आता ती नांदेडपर्यंत धावणार आहे. नांदेड व औरंगाबादहून येणाऱ्या गाड्यांना कायम प्रचंड गर्दी असते. नाशिकच्या हद्दीत आल्यावर नाशिककरांना या गाडीत जागाच राहणार नाही. तसेच गाडीची वेळही पाळली जाणार नाही, असा आक्षेप आहे. यामुळे या निर्णयाला विरोध होणार आहे.