अ‍ॅपशहर

‘अंनिस’चा मोर्चा आता आदिवासी भागाकडे

सर्पदंशापासून कुपोषणापर्यंत अन् भूतबाधेपासून देवदेवस्कीपर्यंतच्या अनेक गूढ किस्स्यांमुळे बदनाम झालेल्या जिल्ह्यातील आदिवासी भागाची प्रतिमा सुधारणे अन् इथल्या माणसांना या जोखडातून बाहेर काढणे यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आदिवासी भागाकडे आपला मोर्चा वळविणार आहे.

जितेंद्र तरटे | MT 11 May 2019, 6:09 am
नाशिक :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम anis


सर्पदंशापासून कुपोषणापर्यंत अन् भूतबाधेपासून देवदेवस्कीपर्यंतच्या अनेक गूढ किस्स्यांमुळे बदनाम झालेल्या जिल्ह्यातील आदिवासी भागाची प्रतिमा सुधारणे अन् इथल्या माणसांना या जोखडातून बाहेर काढणे यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आदिवासी भागाकडे आपला मोर्चा वळविणार आहे. या मोहिमेची सुरुवात म्हणून आजवर जिल्ह्यात शहरी व निमशहरी भागात विस्तारलेल्या या संघटनेने त्र्यंबकेश्वर येथे आदिवासी भागातील पहिली शाखा सुरू केली आहे.

मंत्रभूमी ते यंत्रभूमी अशी ओळख निर्माण करणाऱ्या नाशिक जिल्ह्याचा आदिवासी भाग अद्यापही अनिष्ट प्रथा अन् अंधश्रद्धांच्या विळख्यात आहे. या भागात आदिवासी बांधवांमध्ये प्रबोधन करून या अंधश्रद्धांचा बिमोड करण्याचा संकल्प अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तिशीत प्रवेश करताना सोडला आहे. 'अंनिस'च्या स्थापनेला नुकतेच ३० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने संघटनेच्या कार्यविस्तारावर यापुढील टप्प्यात भर देण्यात येत आहे. याच धोरणांचा भाग म्हणून नाशिक जिल्ह्याच्या नवनियुक्त कार्यकारिणीने आता आदिवासी भौगोलिक क्षेत्रावर लक्ष केंद्रीत केले असून नव्या दमाच्या कार्यकर्त्यांचा शोध पाड्यांवर चालविला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात १० तालुक्यांमध्ये संघटनेचे कार्य सुरू आहे. या तालुक्यातील कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण करून त्यांचेही नाशिक व मालेगांव या ठिकाणी दोन मेळावे होणार आहेत. यात 'अंधश्रद्धा' या शब्दाच्या अर्थापासून ते अंधश्रद्धा निर्मूलनापर्यंत कार्यकर्त्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे.

आदिवासी भागात अंधश्रद्धेचा प्रभाव अद्यापही दिसून येतो. गेल्या काही वर्षात महिलांना डाकीण ठरवून छळण्याच्या घटना 'अंनिस'च्याच माध्यमातून समोर आणल्या गेल्या होत्या. याशिवाय सर्पदंश, विंचूदंश, कुपोषण, आजारपण, गरोदर महिलांच्या समस्या, बाधित वास्तूंबद्दलचे समज आदी प्रश्नही आदिवासी परिसरात आहेत. या विषयांवर लक्ष केंद्रीत करताना अगोदर कार्यकर्त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

होस्टेल्समधूनही पळविणार भूत

आदिवासी भागातील काही होस्टेल्स त्या-त्या परिसरात भूतांच्या अफवांमुळे बदनाम झाले आहेत. गावात होस्टेल्स असूनही अफवांमुळे विद्यार्थी येथे निवासास घाबरतात. अशा समस्याही विचारात घेत शाळा, कॉलेज आणि आदिवासी विभागातील वसतिगृहांमध्ये प्रबोधनात्मक उपक्रम राबवून अफवांचे भूत पळवून लावले जाईल, असा विश्वास संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. सुशील इंदावे यांनी व्यक्त केला.

अंधश्रद्धा निर्मूलनाची गरज आदिवासी भागासही मोठ्या प्रमाणावर आहे. जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांमध्ये संघटना विस्ताराच्या कामावर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. त्र्यंबकमध्ये शाखा उघडून या कामाची सुरुवातही झाली आहे. आदिवासी खेडेपाड्यांवर जाऊन अंधश्रद्धाविरोधी उपक्रमांवर भर दिला जाणार आहे.

- प्रा. सुशील इंदावे, जिल्हा कार्याध्यक्ष, अंनिस

उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी पट्ट्यात अद्यापही कुप्रथा पाळल्या जातात. जात पंचायत मूठमाती अभियानांतर्गत काम करताना याचा प्रत्यक्षानुभव घेतला आहे. या भागातील जनतेला गैरसमजांमधून बाहेर काढण्याचे मोठे आव्हान संघटनेसमोर उभे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करू. सरकारचाही सहभाग याकामी वाढायला हवा.

- कृष्णा चांदगुडे, समन्वयक, जातपंचायत मूठमाती अभियान

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज