म. टा. वृत्तसेवा, सातपूर
भारतीय स्टेट बँकेतील कृषी व कार लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ऋण समाधान योजनेत ज्यांनी ही कर्जे घेतलेली असतील, त्यांनी कर्ज
घेतलेल्या शाखेत जाऊन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्टेट बँकेच्या प्रशासकीय कार्यालयाचे उपमहाप्रबंधक सुधीर भागवत यांनी केले.
याविषयी माहिती देताना भागवत म्हणाले की, नाशिक विभागातील कृषी व कार लोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी सरकारने ऋण समाधान योजना लागू केली आहे. तीन लाखांपर्यंत कर्जधारक असलेल्या ३७५ ग्राहकांचे तब्बल ४ कोटी १७ लाख रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. उर्वरित ८ हजार ६८५ ग्राहकांनी त्वरित बँकेशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेत सरकारकडून दीड लाख तर बँकेकडून तब्बल ५० टक्के कर्जमाफी केली जाणार असल्याचेही भागवत म्हणाले. जास्तीत जास्त ग्राहकांनी योजनेचा लाभ
घेतल्यास त्यांनाही त्याचा फायदा होणार असल्याचे ते म्हणाले. विशेष म्हणजे ८ हजार ६८५ कर्जदार ग्राहकांचे ९० कोटी रुपये बँकेत जमा झाले आहेत. यात संबंधित कर्जदारांनी तत्काळ कर्ज घेतलेल्या शाखेत अर्ज करून ऋण समाधान योजनेचा लाभ घ्यावा. ज्यांनी अर्ज केले त्यांचा विचार बँकेकडून करण्यात येईल. परंतु, ज्यांनी योजनेचा लाभ घेतला नाही, त्यांचे सरकारकडून जमा झालेले पैसे परत जातील, असेही ते म्हणाले.
वसुलीसाठी लावणार तगादा
थकीत कर्जांची संख्या वाढली आहे. यासाठी एसबीआयकडून कर्ज वसुलीसाठी ग्राहकांकडे तगादा लावण्यात येणार आहे. मोठ्या कर्जदारांकडे वसुलीसाठी जाताना जिल्हा प्रशासन व पोलिसांचीही मदत घेतली जाणार आहे. कर्ज वसुली होत नसल्याने बँकेलाही आर्थिक बोजा सहन करावा लागत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे
भागवत यांनी सांगितले.
गृहकर्जाचा बोजा चढविणार
होमलोन घेऊन परतफेड न करणाऱ्या ग्राहकांसाठी शासनाच्या नियमानुसार बोजा चढविला जाणार आहे. गेल्याच आठवड्यात १० गृहकर्जधारकांना नोटिसा देऊन बोजा
चढविण्याबाबत कळविण्यात आले. यानंतर संबंधितांनी तत्काळ घेतलेले कर्ज बँकेत भरले. यातून ८१ लाख रुपये जमा झाले. आता पुन्हा १० गृहकर्जधारकांवर २५
ऑक्टोबर रोजी बोजा चढविण्याबाबत कारवाई केली जाणार असल्याचे भागवत यांनी सांगितले.