म. टा. प्रतिनिधी, नाशिक
जमीन व्यवहाराच्या नावाखाली तिघांना तब्बल पावणे तीन कोटींचा गंडा घातल्या प्रकरणी संशयित किशोर ताराचंद पाटील (रा. महात्मानगर) याला सातपूर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत (दि.२४) पोलीस कोठडी सुनावली आहे. अशा प्रकरणांमध्ये आणखी काही नागरिकांची फसवणूक झाली असण्याची शक्यता असून याबाबत संपर्क साधावा, असे आवाहन सातपूर पोलिस स्टेशनचे सहायक निरीक्षक एस. एस. वऱ्हाडे यांनी केले आहे.
जगदीश माणिकचंद अग्रवाल (वय ६५, रा. कामगारनगर) यांनी १२ एप्रिल २०१७ रोजी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये संशयित पाटील याच्या विरोधात फसवणुकीची फिर्याद दिली होती. डिसेंबर २०१२ ते ऑगस्ट २०१६ या काळात जगदीश यांचा मुलगा माधव अग्रवाल यांना ७५ एकर जागा शोधून ठेवा. आपण ती खरेदी करून एखाद्या कंपनीला अधिक दराने विक्री करू, असे आमिष संशयित पाटील यांनी दाखवले. त्या आमिषाला भुलून जगदीश व माधव अग्रवाल यांनी एक कोटी ३१ लाख २५ हजार तसेच अन्य दोघांकडील एक कोटी ३८ लाख रुपये असे एकूण दोन कोटी ६९ लाख २५ हजार रुपये घेतले. परंतु, त्यानंतर संशयिताने कोणताही व्यवहार केला नाही. तसेच तक्रारदारांचे पैसेही परत केले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अग्रवाल यांनी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये पाटील यांच्या विरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली. अटक टाळण्यासाठी पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली. परंतु, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे पोलिसांनी पाटील याला अटक केली. अशा प्रकारे आणखी काही जणांची फसवणूक झाली असण्याची शक्यता सातपूर पोलिसांनी वर्तविली आहे. पाटील याने फसवणूक केली असल्यास सातपूर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन वऱ्हाडे यांनी केले आहे.