गिरणारेत सोडलेल्या
कुत्र्यांचा बंदोबस्त करा
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नाशिक महापालिकेने पकडलेली कुत्री गिरणारे गावात सोडली जात असून, या ठिकाणी कुत्र्यांमुळे भयभीत वातावरण निर्माण झाले आहे. या सोडलेल्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नाशिक तालुका सरचिटणीस नितीन गायकर यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे केले आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक शहरात दररोज बेवारस कुत्री पकडली जातात. ही कुत्री सोडायची कुठे, असा प्रश्न असल्याने हे कर्मचारी शहरापासून जवळ असलेल्या गिरणारे गावात आणून सोडतात. गावात कुत्र्यांची संख्या वाढल्याने महिलांना व लहान मुलांना रस्त्याचे चालणे मुष्किल झाले आहे.
अनेकदा या कुत्र्यांनी लहान मुलांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच रात्री पुन्हा कुत्री आणून सोडण्यात आली. गावात कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी फिरताना दिसत असून, या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे काही दुर्घटना घडल्यास अनर्थ ओढावण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.