महावितरणचे आवाहन; रोहित्र ठीक तर वीजपुरवठा सुरळीत
...
म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
देशात लॉकडाऊन सुरू असल्याने राज्यातील इतर सर्व वर्गवारीतील ग्राहकांचा वीजवापर झपाट्याने कमी झाला असला तरी घरगुती वीज ग्राहकांच्या वीजवापराच्या आलेखाने अचानक उसळी घेतली आहे. अशा परिस्थितीत विजेचा अतिरिक्त दाब वाढून बिघाड होऊन रोहित्र नादुरुस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अनावश्यक वीजवापर टाळून वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या उद्भवू नये, यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना म्हणून देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोव्हीड १९ या विषाणूच्या संकटकाळातही महावितरण अखंडित वीजपुरवठा करण्यास बांधिल आहे. संचारबंदीच्या या काळात सर्व नागरिक घरी थांबून असल्याने नागरिकांची सर्व भिस्त वीज उपकरणावर राहणार आहे. गरजेची विद्युत उपकरणे वापरण्यासाठी या काळात विजेच्या वापराच्या आलेखाने अचानक मोठी उसळी घेतली आहे. त्यामुळे अतिरिक्त दाबाने रोहित्र नादुरुस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशी परिस्थिती ओढवू नये, यासाठी वीज ग्राहकांनी अनावश्यक वापर टाळला पाहिजे. अतिदाबाची विद्युत उपकरणांचा वापर टाळल्यास अतिरिक्त दाब वाढणार नाही. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत राहण्यास हातभार लागणार आहे.
..
नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करण्यातही अडचण
एकाचवेळी सर्वत्र वापर वाढल्यास रोहित्र नादुरुस्त होण्याची संख्यासुद्धा वाढू शकते. लॉकडाऊनमुळे रोहित्र दुरुस्ती करण्यावर मर्यादा आलेल्या आहेत. खासगी युनिटमध्ये कर्मचारी व साहित्याची वानवा भासू शकते. त्यामुळे ट्रान्सफार्मर मिळण्यास विलंब होऊ शकतो. याशिवाय रोहित्राची वाहतूक करण्यात विलंब होऊ शकतो. कृषिपंप ग्राहकांनी मंजूर क्षमतेचेच कृषिपंप वापरावेत. रोहित्राच्या क्षमतेनुसार वीजवापर करावा आणि अनावश्यक वीजवापर टाळावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.