जून, जुलै कोरडेच; पाणीसंकटाने बळीराजा भयभीत
म. टा. वृत्तसेवा, सटाणा
सटाणा शहरासह बागलाण तालुक्यात पावसाने आतापर्यंत केवळ नावालाच हजेरी लावली आहे. जून महिन तर कोरडाच गेला. आता जुलै महिनाही कोरडाच जातो की काय अशी भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे येणारा श्रावण महिन्यात तरी जोरदार सरी बरसतील, अशी आस आता तालुकावासीयांना लागली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात वरूणराजाने बागलाण तालुक्यावर अन्यायच केलेला दिसून येत आहे. अधूनमधून आलेल्या रिमझिम पावसाने पिकांना दिलासा मिळाला असला तरी विहिरी, नद्या, नाले, धरणे अद्यापही कोरडेच असल्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्यासाठी भयंकर परिस्थित उद्भवणार आहे. सटाणा शहरातील काही भगात तर ५० दिवसांपासून नळांना पाणी आलेले नाही. उन्हाळ्यात दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर पावसाळ्यात जोरदार पाऊस बरसेल ही अपेक्षा फोल ठरल्यामुळे बागलाणवासीय चिंतातूर झाले आहेत. जून कोरडाठाक गेल्यामुळे जुलै महिन्यात तरी पाऊसधारा कोसळतील अशी आस लागली होती. मात्र जुलैचे शेवटचे तीन दिवस उरलेले आहेत. मात्र अजूनही पावसाने तालुक्याकडे पाठ फिरवली आहे.
केळझर, हरणबारी कोरडेठाक
जून व जुलै महिन्यात अशी परिस्थिती असल्यामुळे पुढचे दिवस कसे असतील, या भीतीनेच तालुकावासीयांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. तालुक्यातील केळझर, हरणबारी धरणे अजूनही कोरडीठाक आहेत. लहान प्रकल्पात देखील पाणी नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे धर्मसंकट यभे ठाकले आहे. बागलाणमध्ये आजही जुलै अखेरीस ५१ गावांना ३९ ट्रँकरद्वारे पाणीपुरवठा करणे सुरूच आहे. एप्रिल व मे महिन्यातील टँकर जुलैमध्येही सुरू असल्यामुळे तालुक्यावरील हे जलसंकट श्रावणात तरी दूर होईल, अशी आस आता शेतकऱ्यांना लागली आहे.