सायबर पोलिसांचे आवाहन
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
सणासुदीच्या काळात बँकाना सुट्या असल्याने हॅकर्सकडून या काळात फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहवे. कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये तसेच ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्यावी, बँकेकडून कुठल्याही गोपनीय माहिती विचारणा होत नाही. त्यामुळे कुणालाही ओटीपी अथवा बँक खात्याची माहिती देवू नये, असे आवाहन शहर सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक देवराज बोरसे यांनी केले आहे.
सुटीच्या काळात हॅकर्स सक्रिय असतात. विविध प्रलोभने दाखवत हॅकर्स बँकेतून बोलत असल्याचा बहाणा करतात. त्यातून अनेकांची फसवणूक होते. बोलण्यात अडकवून भामट्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बँकखात्यावर ऑनलाइन डल्ला मारला जातो. सध्या दिवाळीनिमित्त लागोपाठ सुट्या आहेत. या पार्श्वभूमीवर नागरीकांना काळजी घेणे गरजेचे असून फेक कॉल अथवा सोशल मीडियावरील संपर्क टाळावेत. बँकेतून कोणत्याही स्वरूपाचा कॉल येत नाही. लॉटरी अथवा बक्षीस लागल्याचे इ-मेल किंवा कॉल आणि एसएमएसच्या भूलथापांना बळी पडू नये, ऑनलाइन शॉपिंग करतांना सुरक्षित संकेत स्थळाचाच वापर करावा. संपर्क साधणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला सोशल मीडियाच्या माध्यमातून खासगी अथवा आर्थिक संबंधी माहिती देवू नये, ओटीपी आणि यूपीआयआयडी माहिती वा एसएमएस बाबतची माहिती देवू नये असे आवाहन बोरसे यांनी केले आहे.