म.टा.खास प्रतिनिधी, नाशिक
कोरेगाव भिमा येथील घटनेनंतर बुधवारी दलित संघटनेने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमुळे शहरातील सर्व व्यवहार दिवसभर ठप्प झाले. पण, सायंकाळी हा संप मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर शहरातील तणावही निवळला. त्यानंतर शहरातील सर्व व्यवहार पूर्वपदावर आले. काही ठिकाणी तुरळक प्रमाणात दुकान, हॉटेल सुरु झाले. रिक्षाही रस्त्यावर धावू लागल्या. खासगी बसनेही आपली सेवा रात्री सुरू केल्यामुळे प्रवाशांनाही दिलासा मिळाला.
सकाळी या बंदमुळे काही ठिकाणी व्यवहार सुरू होते. बसही व रिक्षाही धावत होत्या. पण, दुपारी १२ नंतर आंदोलनकांनी मोटारसायकलरॅली, रास्ता रोको, निदर्शने करून आंदोलन तीव्र केल्यानंतर सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यानंतर रिक्षा, बस बंद झाल्या. या काळात वैद्यकीय सेवा सकाळपासून सुरू होत्या. त्यामुळे रुग्णांना बंदची झळ बसली नाही.
प्रवाशांना दिलासा
सकाळपासून बस स्टॅण्ड व रेल्वे स्थानकावर ताटकळत बसलेल्या प्रवाशांना संप मागे घेतल्यामुळे दिलासा मिळाला. बाहेरगावहून रेल्वेने आलेल्या प्रवाशांना शहरात येण्यासाठी कोणतेच वाहन उपलब्ध नव्हते. पण, सायंकाळी रिक्षा सुरू झाल्यामुळे त्यांना त्याचा फायदा झाला. बस स्टँण्डवर अडकलेले प्रवाशी रिक्षा सुरु झाल्यामुळे सुखावले. संप मागे घेतल्यानंतरही आदेश न आल्यामुळे एसटी सेवा सुरू नव्हती.