बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढी
एचएससी बोर्डाच्या वेबसाइटवर उपलब्ध
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
इयत्ता बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असते. या वर्षाच्या परीक्षा पूर्ण तयारीनिशी विद्यार्थ्यांना देता याव्यात, यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून प्रश्नपेढी तयार करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांबाबत कल्पना यावी, प्रश्नपत्रिका आराखड्याबाबत असलेली भीती, गोंधळ दूर व्हावा, हा उद्देश प्रश्नपेढी उपलब्ध करून देण्यामागे असल्याचे राज्य मंडळ सचिव डॉ. अशोक भोसले यांनी नमूद केले आहे.
उच्च शिक्षणासाठी बारावीचा पाया महत्त्वाचा असतो. बारावीच्या परीक्षेत मिळालेले गुण यानुसार उच्च शिक्षणाची दिशा निश्चित केली जाते. ही परीक्षा विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण करता यावी, यासाठी प्रश्नपेढीद्वारे प्रोत्साहन दिले जात आहे. यापूर्वी विद्यार्थी मागील प्रश्नपत्रिकांचा आधार घेऊन उजळणी करत असत. आता या नव्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देणार आहे, त्याच वर्षीचा प्रश्नपत्रिकेचा आराखडा समजू शकणार आहे. शैक्षणिक वर्ष २०१८-१९ म्हणजे चालू शैक्षणिक वर्षांपासून याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र विषयांच्या सरावासाठी नमुना प्रश्नपेढी तयार करण्यात आल्या असून बोर्डाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आल्या आहेत. राज्यातील विविध भागांमधील शिक्षकांनी अभ्यासपूर्ण व वेगवेगळ्या प्रकारातील प्रश्न या प्रश्नपेढीत समाविष्ट केले आहेत. विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने व भरपूर सराव करण्याच्या दृष्टीने नमुना प्रश्नपेढी उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. इयत्ता बारावीबरोबरच अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठीही प्रश्नपेढी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.