म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
करोना संकटामुळे बँककडून कर्ज घेतलेल्या कर्जदारांना तीन महिने हप्ते पुढे ढकलण्याची मुभा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे. बँकांकडून याबाबत कर्जदारांमध्ये फारशी जनजागृती करण्यात आलेली नाही. याचा फायदा सायबर चोरटे घेत असून, बँक हप्ते पुढे ढकलयाचे असल्याचा बहाणा या चोरट्यांकडून पुढे करण्यात येत आहे. याबाबत अद्याप गुन्हा दाखल झालेला नसला, तरी अशा फोन कॉल्सपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
देशभरातील व्यवहार ठप्प पडले असून, बहुतांश नागरिक घरांमध्ये बंद आहेत. या संधीचा फायदा घेण्यास सायबर चोरट्यांनी सुरूवात केली आहे. इतरवेळी कार्ड बंद पडले, नवीन कार्ड सुरू करणे, पेन्शन बंद पडली ती सुरू करणे अशी विविध कारणे सायबर चोरट्यांकडून पुढे करण्यात येतात. मात्र, देशच लॉकडाउन असल्याने त्यांची मात्रा बंद पडली. करोनाशी सामाना करताना रिर्झव्ह बँक ऑफ इंडियाने काही नियमांमध्ये बदल केलेत. त्यात कर्जदारांना किमान तीन महिने आपला मासिक हप्ता भरण्यास सूट देण्यात आली. हाच धागा पकडून सध्या सायबर चोरटे सर्वसामान्यांना फोन कॉल्स करीत आहे. शहर सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जदारांना आपला हप्ता स्थगित करण्याचा बहाणा करीत आरोपी कर्जदारास मिळालेला ओटीपी मिळवून घेतात. याच वन टाईम पासवर्डच्या मदतीने कर्जदाराच्या बँक खात्यातील पैशांवर डल्ला मारतात. नाशिक शहरात या प्रकरणी तक्रार दाखल नसली तरी, नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अनोळखी क्रमांकावरून आलेल्या मॅसेजेसला अथवा कॉल्सला माहिती देऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, कर्जाचे हप्ते भरण्याबाबत काही अडचण असल्यास नागरिकांनी थेट बँकेशी संपर्क साधावा. जनधन बँक खात्यांमध्ये केंद्र सरकारकडून पैसे जमा करण्यात येणार असून, या बहाण्याने सुद्धा सायबर चोरटे गंडा घालू शकतात, असे पोलिसांनी स्पष्ट केले.