म. टा. प्रतिनिधी, नाशिक
आयुष्यात चांगला माणूस म्हणून उभे राहणे महत्त्वाचे आहे. शिकून तुम्ही डॉक्टर, वकील, इंजिनिअर व्हा पण त्याआधी चांगले माणूस होणे आवश्यक आहे. शांतारामबापू वावरे हे केवळ राजकारणी नव्हते. त्यांना राजकारणाच्या पलीकडे एक दृष्टी होती. त्यांनी मुलांना सिडको परिसरात उच्च शिक्षण देता यावे यासाठी अपार मेहनत केली. त्यांच्या प्रयत्नामुळे हे महाविद्यालय सुरू झाले, असे प्रतिपादन कवी संदिप जगताप यांनी केले.
ते सिडको येथील शांतारामबापू वावरे कॉलेजमध्ये आयोजित जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक नानासाहेब महाले होते. मंचावर प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, सुलोचना हिरे-वावरे, विक्रम वावरे, विक्रांत वावरे, उपप्राचार्य डॉ. नितीन पाटील, उपप्राचार्य डॉ. ए. के. शिंदे, वाङमय मंडळाचे प्रमुख प्रा. डी. टी. जाधव उपस्थित होते. कॉलेजमधील वाङमय मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
अध्यक्षीय मनोगतात नाना महाले म्हणाले, की शांतारामबापू वावरे म्हणजे माणसातला देवमाणूस. माझ्या जडणघडणीत डॉ. वसंतराव पवार आणि बापू यांचा मोठा वाटा आहे. मुस्लिम समाजानेही त्यांच्यावर प्रेम केले. जातीय सलोखा राखण्यासाठी ते आग्रही असत, असे सांगत शांतारामबापू वावरे यांचे कार्य विषद करताना त्यांनी विविध अनुभवांचे कथन केले.
प्राचार्य डॉ. शिंदे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले, की सिडको कॉलेजची उभारणी आणि इमारत मिळविणे या कामात शांतारामबापू यांनी घेतलेला पुढाकार सविस्तर सांगितला. त्यांना अटक होण्याची वेळ आली असतानासुद्धा ते डगमगले नाहीत म्हणून हे कॉलेज उभे राहिले. वाङमय मंडळ प्रमुख डी. टी. जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. एस. टी. घुले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. नितीन पाटील यांनी आभार मानले. मविप्र संस्थेत संचालक म्हणून निवडून आल्याबद्दल प्राचार्य डॉ. शिंदे यांच्या हस्ते महाले यांचा सत्कार करण्यात आला.