समस्या सोडविण्यासाठी बिगर राजकीय आघाडी स्थापन
म. टा. वृत्तसेवा, मनमाड
धरणात मुबलक पाणी असूनही पाणीपुरवठा वितरण मात्र योग्य नाही. सार्वजनिक आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्याने शहरात मलेरिया, डेंग्यू, घशाचे विकार, किडनीचे विकार यांनी तोंड वर काढले आहे. रस्त्याचा प्रश्न बिकट आहे. खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना पाठीचे आजार जडले आहेत. अशा परिस्थितीतून सध्या मनमाडकर जात आहेत. त्यामुळे निद्रावस्थेत असलेल्या पालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी, पर्यायाने नागरी समस्या सोडविण्यासाठी मनमाड शहरात शहर विकास आघाडीची स्थापना करण्यात आली. ही आघाडी पूर्णतः बिगर राजकीय, असून शहरातील समस्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न ही आघाडी करणार आहे. शहरातील डॉक्टर, वकील, अभियंते, व्यापारी, नोकरदार, तरुण तसेच महिला वर्गाने या आघाडीत सहभागी व्हावे, असे आवाहन आघाडीचे पदाधिकारी राजेंद्र पारीक, संतोष बाकलीवाल, राजकमल पांडे, एस. एम. भाले, राजकमल पांडे यांनी केले आहे.
मनमाड शहराकडे सगळ्यांचेच दुर्लक्ष झाले आहे. वागदर्डी धरण भरलेले असताना शहरात पाण्याचे योग्य नियोजन केलेले नाही. अनेक कारणांमुळे शहराचा विकास खुंटल्याने तरुणांचे स्थलांतर वाढले आहे. शहरात उच्च शिक्षणाची सोय नसल्याने विद्यार्थ्यांवर बाहेरगावी जाण्याची वेळ येते. उपजिल्हा रुग्णालयातही आरोग्य सुविधांची वानवा आहे. त्यामुळे यासर्व प्रश्नांवर ही समिती आवाज उठविणार आहे.
मनमाडच्या नागरी समस्या दूर करण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे. नागरिकांना सुविधा देण्यात याव्यात, यासाठी समिती प्रयत्न करणार आहे. सर्वसामान्य मनमाडकरांचा आवात नागरिकांचा आवाज पालिका प्रशासनापर्यंत पोहचविण्याचा समितीचा प्रयत्न असे.
राजेंद्र पारीक, अध्यक्ष, शहर विकास आघाडी