म. टा. प्रतिनिधी, नाशिक
गिर्यारोहकांना हिमालयाची चढाई सातत्याने खुणावत असते. हिमालयातील सारपास शिखरावर चढाई करण्याचे स्वप्न महिंद्रा आणि महिंद्रा कारखान्यातील नऊ गिर्यारोहकांनी पूर्ण केले आहे.
हे अत्यंत खडतर असलेले सारपास शिखर गिर्यारोहकांनी अकरा दिवसांत सर केले. शिखर सर केल्यानंतर १३ हजार ९०० फूट उंचीवर भारताचा ध्वज फडकावून आनंद व्यक्त केला. वेगाने उलटे वाहणारे वारे, उणे एक अंश सेल्सियस तापमान असताना या गिर्यारोहकांनी शिखरावर चढाईसाठी सुरुवात केली. चढाईदरम्यान आलेल्या सर्व संकटांवर मात करून ध्येय गाठले. कुलू-मनाली येथील शिवालिक रेंजमध्ये १३ हजार ९०० फूट उंचीवर सारपास शिखर आहे. यूथ होस्टेल असोसिएशन ऑफ इंडियातर्फे मे व जून महिन्यात गिर्यारोहकांसाठी सारपास शिखर सर करण्याची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत महिंद्रा आणि महिंद्रा, नाशिक प्लान्ट १ चे संतोष जाधव, अश्विन अडोळे, मंगेश मुसळे, नीलेश कालेकर, संजय घुगे, सायली मोरे, संकेत पिंपळापुरे तसेच जिल्ह्यातील स्वरूप कापे आणि आतिश भोईर यांनी सहभाग नोंदवला. त्यांनी सात दिवसांत ६८ किलोमीटर खडतर प्रवास करून हे शिखर सर केले. वेगाने वाहणारे वारे तसेच कमाल तापमान ८ ते किमान तापमान उणे ५ अंश असताना त्यांनी हिमाचल प्रदेशातील कसोल बेस कॅम्पवरून चढाईला सुरुवात केली. वातावरणाशी जुळवून घेत त्यांनी टप्प्या-टप्प्याने शिखरावर चढाई केली. चढाईदरम्यान नगारू ते बिस्किरीदरम्यानचा १३ हजार ९०० फूट उंचीवर असलेला टप्पा सर्वात अवघड मानला जातो. साधारणतः १४ किलोमीटरचे हे संपूर्ण अंतर बर्फाच्छादित असून, ते चालत आणि एका ठिकाणी १.५ किमीची स्लाइड म्हणजेच घसरून पार करावे लागते. सर्वांनी सारपास शिखर सर करण्यासाठी नगारूवरून मध्यरात्री ३.३० वाजता प्रारंभ केला. २०० मीटर अवघड चढाई पार केल्यावर सारपासच्या बर्फाच्छादित पठाराला सुरुवात होते. या सर्व वेळेत महिंद्रा आणि महिंद्राच्या योगेश कानवडे यांनी चमूला मार्गदर्शन केले.