म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांमुळे जिल्हा परिषदेच्या चार जागा रिक्त झाल्या असून, त्यापैकी तीन जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. एक गट वगळता गोवर्धन, मानूर आणि खेडगाव या गटांसाठी १२ डिसेंबरला मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, तर १३ डिसेंबरला मतमोजणी करण्यात येणार आहे. याचवेळी निफाडमधील नांदुर्डी आणि नांदगावमधील न्यायडोंगरी या पंचायत समितीच्या दोन गणांसाठीदेखील पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.
राज्यातील जिल्हा परिषदेच्या १५ आणि पंचायत समितीच्या १३ रिक्त जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यात जिल्ह्यातील गोवर्धन (ता. नाशिक), मानूर (ता. कळवण) आणि खेडगाव (ता. दिंडोरी) या गटांचा समावेश असून, तेथे निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. एप्रिल-मे महिन्यात घेण्यात आलेली लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी मानूर गटाच्या लोकप्रतिनिधी भारती पवार आणि खेडगाव गटाचे लोकप्रतिनिधी धनराज महाले यांनी राजीनामा दिला होता. विधानसभा निवडणुकीसाठी गोवर्धन गटाचे राष्ट्रवादीचे सदस्य हिरामण खोसकर यांनीही राजीनामा दिला होता. त्यामुळे या रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. येथे प्रचाराचा धुरळा उडणार असून, निवडून येण्यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी केली जाऊ लागली आहे. या निवडणुकीसाठीची अंतिम मतदारयादी ११ नोव्हेंबरला प्रसिद्ध झाली आहे.
---
कनाशीत तूर्त निवडणूक नाही
कळवणच्या कनाशी गटातून राष्ट्रवादीचे नितीन पवार निवडून आले आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीकडूनच उमेदवारी केली. त्यामुळे पक्षांतरबंदीचा कायदा त्यांना लागू पडत नाही. विधानसभेवर निवडून जाणाऱ्या गट सदस्याचे जिल्हा परिषदेतील सदस्यत्व आपोआप रद्द होते. परंतु, अद्याप सरकारची स्थापना आणि आमदारांचा शपथविधीही न झाल्याने पवार यांचे जिल्हा परिषदेचे सदस्यत्व कायम आहे. त्यामुळे येथील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.
-
असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम
--
अधिसूचना प्रसिद्ध - २२ नोव्हेंबर
उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत- २२ ते २७ नोव्हेंबर
अर्ज छाननी- २८ नोव्हेंबर
अर्ज माघारीची मुदत (जेथे अपिल नाही)- ४ डिसेंबर
अर्ज माघारीची मुदत (जेथे अपिल आहे)- ७ डिसेंबर
मतदान - १२ डिसेंबर
मतमोजणी - १३ डिसेंबर
-
आचारसंहितेचे पालन व्हावे
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेले गोवर्धन, मानूर आणि खेडगाव गट, तसेच नांदुर्डी आणि न्यायडोंगरी या दोन गणांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी केली जावी आणि कुणाकडूनही आचारसंहिताभंग होणार नाही याची काळजी घेतली जावी, असे आवाहन मंगळवारी सर्वसाधारण सभेत अधिकाऱ्यांकडून करण्यात आले.