अ‍ॅपशहर

आक्रमक वक्तव्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या नाना पटोलेंचा भाजपवर नवा आरोप; म्हणाले...

नाना पटोले यांनी पुन्हा नवे आरोप केल्याने या आरोपांना भाजपकडून काय उत्तर दिलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jan 2022, 8:37 am
नाशिक : कार्यकर्त्यांसोबत बोलताना केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे चर्चेत असलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole) यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपने केलेल्या चुकांची किंमत आता मोजावी लागत असून त्यांच्यामुळेच राज्यामध्ये वीज निर्मिती करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. तसंच येणाऱ्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेस अनेक महापालिकांमध्ये सत्ता स्थापन करेल, असा दावा देखील त्यांनी केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nana patole nashik
नाना पटोले


गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे सुरू असलेल्या मुंबई प्रदेश काँग्रेसच्या प्रशिक्षण वर्गाचा समारोप रविवारी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की, आजच्या परिस्थितीमध्ये वीज निर्मितीमध्ये राज्य अग्रेसर होत आहे. परंतु जी विजेची टंचाई निर्माण झाली त्याला सर्वस्वी यापूर्वीचे भाजप सरकार जबाबदार आहे. त्यांनी सत्तेत असताना कोणतंही नियोजन केलं नाही. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली, असा घणाघात पटोले यांनी केला.

मी राजकारणातील कुंभार, आतापर्यंत अनेक नेते तयार केले; दानवेंचा कार्यकर्त्यांना बूस्टर डोस

'भाजपने केंद्र सरकारमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराकडे लक्ष द्यावं'

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर टीका करण्यापूर्वी भाजपने सत्ता काळात किती रुपयांचं कर्ज माफ केलं, याचा आकडा घोषित करावा. म्हणजे जनतेला खरं काय आणि खोटं काय हे समजेल, असं सांगून नाना पटोले म्हणाले की, शिवसेनेनेबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी केलेली तक्रार म्हणजे काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगडफेक करण्यासारखं आहे. त्यामुळे भाजपने या सर्व विषयांवर न बोलता आपल्या केंद्र सरकारच्या काळात किती मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे हे आधी बघावं, असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, नाना पटोले हे आपल्या आक्रमक विधानांसाठी ओळखले जातात. केंद्र सरकारवर आता त्यांनी पुन्हा नवे आरोप केल्याने या आरोपांना भाजपकडून काय उत्तर दिलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज