म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
करोना आपल्या दारात येत नाही, तर आपणच करोनाला आपल्या दारात आणत आहोत. त्यामुळे सर्वांनीच सुरक्षित वावराचे नियम पाळणे गरजेचे आहे. अन्यथा शहरातील रुग्णसंख्येत वाढ होतच राहील. नाशिककरांनी याचे भान ठेवले नाही, तर सर्व व्यवहार बंद करून पुन्हा निर्बंध आणावे लागतील, असा इशारा महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी 'मटा फेसबुक लाइव्ह' कार्यक्रमात मंगळवारी दिला.
आपल्याला आता करोनासोबत जगायची सवय करावी लागणार आहे. त्यामुळे करोनाची लक्षणे दिसल्यास तत्काळ उपचार घ्या, बाजारपेठा, उद्योग सुरळीत करून अर्थचक्र सुरू करणे आणि उपचारांची क्षमता वाढविणे या त्रिसूत्रीद्वारे आपण करोनाचा सक्षमपणे मुकाबला करू शकतो आणि सर्वकाही सुरळीतही ठेवू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या नाशिक आवृत्तीच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त सुरक्षित वावराचे पालन करीत यंदा ऑनलाइन कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यात नऊ मान्यवरांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले असून, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या रुपाने मंगळवारी दुसरे पुष्प गुंफण्यात आले. माजी आमदार तथा कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे सल्लागार हेमंत टकले यांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली. फेसबुक लाइव्हवरील या मुलाखतीचा आनंद घेणाऱ्या वाचकांनी विचारलेल्या प्रश्नांना आयुक्त गमे यांनी दिलखुलासपणे उत्तरेही दिली.
शहरात १९ मेपर्यंत अवघे ५० रुग्ण होते. परंतु, आता अचानक रुग्ण वाढले आहेत. नाशिकमध्ये करोना आलेला नाही, तर नाशिकच्याच नागरिकांनी तो आणला आहे. लॉकडाउन खुले होताच मुंबई, पुणे, मालेगाव, धुळे, जळगाव येथून मोठ्या संख्येने नागरिक शहरात आले. शहरातील नागरिकही शहराबाहेर जाऊन आले. त्यामुळे शहरात करोनाचा उद्रेक झाल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
--
...तरच रुग्णसंख्येवर नियंत्रण शक्य
शहरात करोनाचे रुग्ण वाढत असले, तरी घाबरण्याचे कारण नाही. शिस्त पाळली आणि सहकार्य केले, तर वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण येऊ शकते, असा दिलासाही आयुक्तांनी नाशिककरांना दिला आहे. नियोजन करून आपण सुरुवातीला करोनाला नियंत्रित ठेवले होते, असे सांगत आता शहराचे अर्थचक्र सुरू करण्याचे आव्हान आहे. शहरातील व्यवहार सुरू करण्यास प्राथमिकता आहे. सर्व उद्योग, बाजारपेठा सुरळीत राहण्याचे नियोजन आहे. परंतु, नागरिकांकडूनही शिस्त पाळण्याची अपेक्षा आहे. नाशिक सुरक्षित ठेवण्यासाठी सगळ्यांनी हातभार लावणे गरजेचे असल्याचेही आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. मार्केट बंद करण्याची वेळ नाशिककर आणणार नाहीत, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.
--
जादा बिलाबाबत पथक नियुक्त
करोनाची लक्षणे आढळल्यास शहरातील बड्या हस्तींकडून खासगी रुग्णालयांमध्ये दाखल होण्यास प्राधान्य दिले जात आहे. परंतु, त्यामुळे ज्यांना उपचारांची गरज आहे अशांना योग्य उपचार मिळत नसल्याने लोकांनी लक्षणे नसल्यास रुग्णालयात दाखल होण्याचा आग्रह धरू नये, असे आवाहन आयुक्तांनी यावेळी केले. काही रुग्णालयांकडून रुग्णांची बिलाबाबत लूटही होत आहे. अशी लूट थांबविण्यासाठी अतिरिक्त आयुक्त बोधिकिरण सोनकांबळे यांच्या नेतृत्वाखाली पथक स्थापन केले आहे. तीन तक्रारींबाबत पथकाकडून चौकशी केली जात असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
---
आयुक्त म्हणतात...
--
-धोका मोठा, नियम पाळणे गरजेचे
-गर्दी वाढल्यास बंधने आणावी लागतील
-करोनाचे रुग्ण वाढले, तरी यंत्रणा सज्ज
-दाट लोकवस्तीचे परिसर होताहेत 'सील'
-डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास करोना राहील नियंत्रित
-सौम्य लक्षणे असल्यास घरीच उपचारांना परवानगी
-खासगी रुग्णालयांचीही घेतली जातेय मदत
-शाळा सुरू करण्याबाबत शासन स्तरावर विचार
-करमणूक, सांस्कृतिक केंद्रांबाबत शासन घेईल निर्णय