अ‍ॅपशहर

रेशनच्या दारी, कटकटच सारी! बडदेनगरच्या दुकानदाराविरोधात ग्राहक संतापले

धान्य आले आहे का? धान्य घेण्यासाठी केव्हा यावे लागेल? याबाबत फोनवर विचारणा करूनच बहुतांश पात्र लाभार्थी धान्य घेण्यासाठी दुकानात जातात. परंतु तेथे गेल्यावर मात्र ‘धान्य संपले, आता पुढील महिन्यात या’, अशा शब्दात संबंधित दुकानदाराकडून बोळवण केली जाते.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 24 Nov 2022, 2:01 pm
नाशिक : रेशन दुकान म्हटले की तेथे अनियमितपणा, उर्मटपणा, फसवणूक आणि त्यावरुन होणारे वादविवाद असे प्रकार आता नवीन राहिले नाहीत. मात्र ‘ज्यांना माझ्याकडून रेशन घ्यायचे नसेल त्यांनी दुकान बदलून घ्या’, असा उपरोधीक सल्ला बडदे नगरातील रेशन दुकानदाराने दिल्याने परिसरातील ग्राहक संतापले असून, संबंधित दुकानदाराविरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ration shop2
रेशनच्या दारी, कटकटच सारी! बडदेनगरच्या दुकानदाराविरोधात ग्राहक संतापले


बडदेनगर परिसरातील एका स्वस्त धान्य दुकानात स्वस्त व मोफतचे धान्य वितरणात अनियमितता होत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. शहरातील अन्य पात्र लाभार्थींना त्यांच्या परिसरातील दुकानदारांकडून नियमितपणे धान्य वितरण होते. परंतु बडदेनगर येथील दुकानदाराकडून धान्य मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. ‘स्वस्त धान्य दुकानदाराने गेल्या महिन्यात रेशन दिलेच नाही’, ‘माझ्या कुटुंबात तीन सदस्य आहेत. त्यानुसार मला १५ किलो धान्य मिळणे अपेक्षित असताना दुकानदार मात्र दहा किलोच धान्य देतो’, अशा प्रकारच्या तक्रारी या परिसरातील ग्राहकांनी केल्या आहेत. याबाबत संबंधितास विचारणा केल्यास ‘तुम्ही दुकान बदलून घ्या’, अशा शब्दात दुकानदाराने उत्तर दिल्यामुळे ग्राहकांनी संताप केला.

म्हणे, धान्य संपले, पुढच्या महिन्यात या!

धान्य आले आहे का? धान्य घेण्यासाठी केव्हा यावे लागेल? याबाबत फोनवर विचारणा करूनच बहुतांश पात्र लाभार्थी धान्य घेण्यासाठी दुकानात जातात. परंतु तेथे गेल्यावर मात्र ‘धान्य संपले, आता पुढील महिन्यात या’, अशा शब्दात संबंधित दुकानदाराकडून बोळवण केली जाते. गेल्या महिन्यातही पात्र लाभार्थींना असाच अनुभव आला. या महिन्यातही धान्य घेण्यासाठी गेलेल्या पात्र लाभार्थींना पुढील आठवड्यात या असे सांगण्यात आले.

निदर्शनांचा इशारा

संबंधित दुकानदाराला ग्राहकांनी जाब विचारला असता ‘माझ्याबद्दल ज्यांना तक्रार असेल, त्यांनी आपले रेशन दुकान बदलून घ्यावे,’ असे सांगत संबंधित दुकानदाराने या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु पुढील आठवड्यात धान्य मिळाले नाही तर दुकानासमोरच निदर्शने करू, असा इशारा लाभार्थींनी दिला आहे.

‘तो’ अधिकार ग्राहकांना

घराजवळील किंवा सोयीच्या स्वस्त धान्य दुकानातून रेशन घेता यावे यासाठी प्रशासनाने ‘वन नेशन, वन राशन’ ही योजना सुरू केली आहे. ग्राहक सोयीच्या ठिकाणच्या दुकानातून स्वस्त धान्य घेऊ शकतो. परंतु हे दुकान निवडण्याचा अधिकार संबंधित ग्राहकाला आहे. असे असताना रेशन दुकानदार ‘दुकान बदलून घ्या’, असे कसे सांगू शकतो, असा सवाल लाभार्थींनी केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज