बाजार समितीच्या आवारात गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची अधिकारी, कर्मचाऱ्यांची होते कसरत
...
रामनाथ माळोदे, पंचवटी
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्यांवरील जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. त्यात भाजीपाला, अन्नधान्य, फळे यांचा पुरवठा करण्याची यंत्रणा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कार्यरत आहे. अत्यंत गर्दीच्या ठिकाणी काम करण्याची वेळ येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर येत आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवून व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी ते प्रचंड कसरत करीत आहेत.
बाजार समितीच्या दिंडोरी रोड व पेठरोड अशा दोन ठिकाणच्या आवारात बाजार भरतो. शेतकऱ्यांसह विविध घटकांची या बाजारात वर्दळ असते. ही गर्दी कमी करण्यासाठी किरकोळ विक्री बंद करण्यात आली आहे. दिंडोरी रोडच्या बाजारात केवळ भाजीपाल्याचे लिलाव मर्यादित ठेवण्यात आलेले आहेत. पेठरोडला फळे, कांदा-बटाटा व अन्नधान्याचा बाजार भरतो. दोन्ही ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी-विक्री होत असल्यामुळे बाजारातील गर्दीवर नियंत्रण आणणे अनेकदा कठीण होते. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात बाजाराचे नियोजन वेळोवेळी बदलण्यातही आले आहे.
बाजार समिती अधिकारी व कर्मचारी मिळून १२० जण कार्यरत आहेत. त्यांच्या सहकार्याने बाजारात अडतदार, व्यापारी, शेतकरी, हमाल, मापारी आदी घटक मिळून केवळ नाशिकमध्येच नव्हे, तर इतर प्रमुख शहरांमध्येही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येत आहे. दिंडोरीरोडच्या मार्केटला २०० ते ३५० आणि पेठरोडला १५० ते २०० शेतकऱ्यांची वाहने रोज येत आहेत. गर्दीच्या नियोजनासाठी किरकोळ भाजीपाला विक्री पूर्णपणे बंद केली आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ध्वनिक्षेपकावरून सूचना देण्यात येत आहे. भाजीपाला विक्री केल्यानंतर ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना पेमेंट केले जाते, तेथे सुरक्षित वावर पाळण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
शहरातील सर्व व्यवहार बंद असताना गर्दी होणारे एकमेव ठिकाण म्हणून मार्केट यार्डची ओळख झाली आहे. अशा गर्दीच्या ठिकाणी काम फार हिमतीने करावे लागत आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर फळे खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांमुळे येथे यात्रेपेक्षाही जास्त गर्दी झाली होती. पोलिसांची मदत घेऊनही ही गर्दी आवरणे मुश्किल झाले होते, अशा परिस्थितीत हे कर्मचारी काम करीत आहेत.
...
आवारातील स्वच्छतेवर भर
बाजार समितीचे आवार हे कायम गजबजलेले असते. या आवाराच्या स्वच्छतेच्या कामाला जनता कर्फ्यूपासून जोमाने सुरुवात करण्यात आली. दोन्ही आवार धुऊन जंतूनाशकाची फवारणी करण्यात आली. बाजाराच्या आवारात रोज सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी करण्यात येते. प्रवेशद्वार तसेच मुख्य कार्यालय येथे सॅनिटायझर टनेल बसविण्यात आले आहे. आवारात येणाऱ्यांसाठी पाण्याच्या टाक्या, तेथे हात धुण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.