ई चलानद्वारे एक कोटी रुपये जमा
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
ई-चलान पद्धतीने दंड वसूल करणाऱ्या शहर वाहतूक शाखेने एप्रिल ते जुलै या चार महिन्यांमध्ये तब्बल एक कोटी रुपयांचा दंड जमा केला. वाहतूक शाखेने दंड पावती पुस्तक इतिहास जमा केले असून, या नवीन पद्धतीमुळे पळून जाणाऱ्या चालकाच्या वाहनावरील दंड मात्र कायम ठेवणे शक्य झाले आहे. एक राज्य एक चलान या पद्धतीमुळे नाशिकच नव्हे तर राज्यातील कोणत्याही वाहतूक पोलिसाला हा दंड वसूल करता येणे शक्य होते.
आर्थिक घोळ आणि वाहतुकीला शिस्त लावण्याची परिणामकारकता यामुळे वाहतूक विभागात दंड वसुल करण्यासाठी वापरण्यात येणारे पावती पुस्तक बंद करण्यात आले आहे. अगदीच निकडीच्या वेळी या पुस्तकांचा वापर होतो. एखाद्या वाहनचालकाने वाहतूक नियमभंग केला की त्या वाहनाचा क्रमांक विशिष्ट सॉफ्टवेअर असलेल्या मशिन्समध्ये टाकला जातो. तिथे वाहतूक पोलिस कर्मचारी दंडाची रक्कम नमूद करतात. वाहनचालकाने लागलीच डिजिटल अथवा रोख पद्धतीने दंडाची रकम अदा केली तरच त्या वाहनक्रमाकांवरील दंडाची रकम कमी होते. अन्यथा ती रकम तशीच राहते.
याबाबत वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त अशोक नखाते यांनी सांगितले, की ई-चलान पद्धत पोलिस आणि वाहनचालकांच्या दृष्टीने फारच पारदर्शक आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकाचा मोबाइल क्रमांक प्रादेशिक परिवहन विभागाशी संलग्न असल्यास अशा वाहनचालकास नियमभंगाचे कलम, दंडाची रकम, ती भरल्यानंतर ई रिसीट असे सर्व मोबाइलवरच उपलब्ध होते. मोबाइल क्रमांक सलंग्न नसेल तर वाहतूक शाखा त्या वाहन क्रमाकांच्या आधारे नोटीस काढते. नियमभंग केल्यानंतर १५ दिवसांच्या आत संबंधित वाहनचालकाला दंड भरणे बंधनकारक असते. दंडाची रकम भरण्यास टाळाटाळ केल्यास संबंधित वाहनचालकाला कोर्टाकडून समन्स काढता येऊ शकतो. तसेच त्या वाहनचालकाला राज्यात कोठेही वाहतूक पोलिसांने पकडले तर दंडाची थकबाकी वसुल करता येते. अशा वेळी त्यास सूट दिली जात नाही. नाशिकमध्ये मुंबईतील एका इनोव्हा चालकाकडून १२ हजार रुपये वसूल करण्यात आले होते, असेही नखाते यांनी स्पष्ट केले.
पळ काढणाऱ्यांच्या दंडात वाढ
एप्रिल ते जुलै २०१९ या काळात शहर वाहतूक शाखेने ई-चलानमार्फत ४८ हजार ९४८ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. याद्वारे एक कोटी नऊ लाख ५९ हजार ९०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. दुसरीकडे याच कालावधीत १० हजार ५२० वाहनचालकांवर कारवाई झाली. मात्र, त्यांनी दंड भरला नाही. यातील बहुतांशवेळी वाहनचालक पळून जाण्याचा प्रयत्न किंवा पळून जातात. वाहतूक पोलिसांना दमबाजी सुद्धा केली जाते. अशा चालकांच्या दंडरकमेत वाढ होते. सर्व नियमांचा येथे विचार केला जातो. वाहन क्रमांकावर जमा दंड हा कायमस्वरूपी असून, तो भरल्याशिवाय गंत्यतर नसते, असेही नखाते यांनी सांगितले.