तळेगाव रोही येथील घटना; पोलिसांचे हातावर हात
म. टा. वृत्तसेवा, येवला
दरसवाडी-डोंगरगाव पोहच कालवा चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथे जेसीबीच्या सहाय्याने फोडण्यात आला असून, लाखो लिटर पाणी वाया जात आहे. कालवा फोडणाऱ्या अज्ञातांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. मात्र इतकी मोठी घटना घडूनही नांदूरमध्यमेश्वर कालवा विभाग व चांदवड तालुका पोलिस यांच्यातील समन्वयाअभावी कालवा फोडणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने येवला तालुक्यात संताप व्यक्त होत आहे.
दरसवाडी कालव्यातून पाणी येवल्याकडे मार्गक्रमण करीत असताना तळेगावरोही जवळ शनिवारी २६ रोजी सकाळच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी अनाधिकृतरीत्या कालवा फोडून पाण्याचा अपव्यय करण्यात आला, असे पत्र चांदवड तालुका पोलिसांना दिले. मात्र पोलिसांनी या विषयी कोणताही गुन्हा न दाखल करता टाळाटाळ केली. स्थानिक पोलीस अपराधींनी पाठीशी करीत असल्याचे दिसून येत असल्याने वरिष्ठांनी या गंभीर प्रकाराची दखल घ्यावी अशी मागणी येवला तालुकावासीयांनी केली आहे. याबाबत चांदवड पोलिसांशी संपर्क केला असता पाटबंधारे विभागाने दिलेल्या पत्राची पोहच देण्यात आली असून, गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती ठाणे अंमलदार यांनी दिली. तर याबाबत चांदवड तालुका पोलिस निरीक्षक यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता पाटबंधारे विभागाने माहिती दिली नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. पोलीस स्थानकात पत्र दिल्याची माहिती दिल्यावर पाटबंधारे विभागानेच कारवाई करावी, पोलिस काय गुन्हा दाखल करतील अशी सारवासारव करून चौकशी करून कारवाई करतो असे मोघम उत्तर दिले. पोलीस प्रशासनच अनास्था दाखवत असेल तर न्याय मागायचा कुणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भुजबळांनी केला फोन
येवला पंचायत समिती सदस्य मोहन शेलार यांनी आमदार छगन भुजबळ यांना या घटनेची माहिती देताच भुजबळ यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करून कालवा फोडणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची सूचना केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.