म. टा. वृत्तसेवा, निफाड
निफाड तालुक्याच्या पूर्व भागात असणाऱ्या वनजमिनींवर पर्यटन केंद्र विकसित करा, अशा आशयाचे निवेदन उत्तमानंद बहुउद्देशीय संस्थेने पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना दिले आहे. निफाड तालुक्याच्या पूर्व भागात खाणगावथडी, करंजी, ब्राह्मणवाडे, नांदूरमध्यमेश्वर या परिसरात मोठ्या प्रमाणावर वनजमिनी आहेत. तालुक्याचा हा भाग पर्यटनाचा केंद्रबिंदू असूनही तो कायम दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळेच नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यातील वनजमिनीवर काटेरी झाडे, उसासारखे पीक असल्याने बिबटे, रानडुक्कर, तरस, आदी जंगली हिंस्र प्राण्यांमुळे शेतकरी, शेतमजूर व पाळीव प्राणी यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्राण्यांच्या हल्ल्यामुळे दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागातील वनजमिनीवर पर्यटन केंद्र उभारल्यास पक्षी, जंगली प्राणी यांना सुरक्षित अधिवास उपलब्ध होऊन संरक्षण होईल, भौगोलिक दृष्ट्या हा परिसर समृद्ध असून पर्यटनाला पुष्कळ वाव आहे. याचा विचार करून महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाने पर्यटन केंद्र विकसित करावे अशी मागणी केली आहे. यावेळी श्री उत्तमानंद बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संजय नागरे, भाजप जिल्हाध्यक्ष दादा जाधव, शिवम आव्हाड, उद्धव जगताप आदी उपस्थित होते.