वन्यजीव जीवशास्त्रज्ञ निकीत सुर्वे यांचे प्रतिपादन
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
माणसांची संवाद साधता येतो मात्र बिबट्यांशी संवाद साधता येत नाही त्याकरता माणसांनीच एकमेकांसी संवाद साधून बिबट्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन वाइल्ड लाइफ कॉन्सर्वेशन सोसायटीचे वन्यजीव जीवशास्त्रज्ञ निकीत सुर्वे यांनी केले. राज्य सरकारच्या वनविभागाच्या वतीने झालेल्या कार्यशाळेत ते बोलत होते.
उंटवाडी येथील वनसंरक्षक कुटी येथे माणूस व बिबट्या यामधील परस्पर संबंध या विषयावर कार्यशाळा झाली. यावेळी निकीत सुर्वे यांनी दोघांमधील संबंध उपस्थितांना उलगडून सांगितले. ते म्हणाले, बिबटे हे मनुष्यवस्तीजवळ प्रामुख्याने आढळतात. पाळीव प्राणी हे बिबट्यांचे भक्ष आहे. ज्या ठिकाणी पाळीव प्राण्यांचे वास्तव्य असते अशा ठिकाणी बिबटे हमखास पहायला मिळतात. उसाचा मळा एकदा लावल्यानंतर दोन वर्षे त्याकडे कुणी पहात नाही. ही जागा बिबट्यासाठी सुरक्षित असल्याने याच शेतात बिबटे रहातात. ऊस कापणीला येतो तेव्हा बिबट्याची पिले त्या ठिकाणी आढळतात. सापडलेली पिल्ले माणसे आपल्याजवळ बाळगतात. परंतु, ही पिल्ले पुन्हा त्या ठिकाणी ठेवून दिल्यास बिबट्याची मादी त्यांना आपल्या ठिकाणी घेऊन जाते.
ज्या भागात बिबट्यांचा वावर आहे अशा ठिकाणी लहान मुलांना एकटे सोडू नये. तसेच सोबत बॅटरी व मोबाइल बाळगावा. तसेच ज्या ठिकाणी घाण आहे त्या ठिकाणी कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. या कुत्र्यांचे भक्षण करण्यासाठी बिबटे येत असतात. त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी माध्यामांनी वार्तांकन करताना काय काळजी घ्यावी, याबद्दल रणजीत जाधव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पश्चिम विभागाच्या मुख्या वनसंरक्षक टी. ब्युला एलील मती, डॉ. एस. सीवा बाला यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
मादी बिबट्या अधिक आक्रमक
बिबट्याची मादी हे नरापेक्षा जास्त आक्रमक असते. बिबट्या पिलांना कुणी शिक्षण देत नाही ते आपल्या आईकडूनच शिक्षण घेतात. दोन वर्षांपर्यत आई त्यांचा सांभाळ करते; त्यानंतर त्यांना सोडून देते. दोन वर्षानंतर मादी पुन्हा दुसऱ्या पिल्लांना जन्म देते. हे चक्र असेच सुरू रहाते, अशी माहिती निकीत सुर्वे यांनी दिली.