म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
लोकसभा निवडणुकीत अगोदर स्थानिक उमेदवारांची चर्चा रंगली होती; पण देशातील सातपैकी पाच टप्प्यांचे मतदान झाल्यानंतर आता चर्चा देशातील लोकसभेच्या निकालाची रंगू लागली आहे. त्यामुळे स्थानिक अंदाजापेक्षा आता देशातील निकालावर ठिकठिकाणी चर्चा होत असल्याचे चित्र आता दिसू लागले आहे. त्यात अनेक जण अंदाज बांधून आपला आकडा समोर पुढे करीत आहेत.
लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या ११ दिवसांवर आल्यामुळे सर्वांनाच कोणाचे सरकार येईल, पंतप्रधान कोण असेल, याबाबत औत्युक्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वृत्तपत्र, न्यूज चॅनल, सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीपेक्षा प्रत्यक्ष चर्चा करून एकमेकांना काय वाटते, असा प्रश्न विचारला जात आहे. सर्वसाधारणपणे राजकारणाची फारशी माहिती नसणारेसुद्धा छातीठोकपणे राजकीय तज्ज्ञ असल्यासारखे दावे करीत आहेत. चहाची टपरी, हॉटेल, प्रवासात व चौकाचौकांत या राजकारणाच्या गोष्टी रंगू लागल्या आहेत.
जिल्ह्यात चौथ्या टप्यात नाशिक, दिंडोरीसह धुळे मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघांत मतदान झाले. त्यानंतर स्थानिक उमेदवारांबाबत जोरात चर्चा सुरू झाली. त्यात कोण आघाडी घेईल, कोणाला मतदान किती पडेल, कोण कोणत्या ठिकाणी आघाडीवर असेल हे विषय चर्चिले गेले; पण त्यानंतर राज्याच्या निवडणुकीच्या निकालावर लोकं बोलू लागली. मात्र, काही दिवसांनी देशातील लोकसभेच्या निवडणुकीने रंग भरला तशा चर्चेची दिशाही राष्ट्रीय पातळीवर गेली.राजकारणावर फारशा न बोलणाऱ्या महिलाही आता या विषयावर जास्त रस घेतल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी घरात किंवा महिलांच्या ग्रुपमध्येसुद्धा राजकीय चर्चा होत आहेत.
तब्बल सहा विधानसभा मतदारसंघ असलेल्या एका लोकसभा मतदारसंघात तसा अंदाज बांधणे अवघड असले तरी त्यावर सुरुवातीचे आठ दिवस जोरदार चर्चा रंगत. या चर्चेमुळे अनेकांनी डोके पिकले, असे सांगत संतापही व्यक्त केला. मात्र, या चर्चा आता बंद झाल्या असून, राष्ट्रीय पातळीवरच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.