शासकीय इतमामात अंत्यसंस्कारात दिरंगाई; कार्यकर्ते नाराज
म. टा. वृत्तसेवा, मनमाड
आयुष्यभर तत्वांशी बांधिलकी सांगणारे व मूल्यांशी निगडित राहणारे राजकारण करीत आपले वेगळे अस्तित्व जपणाऱ्या कॉ. माधवराव गायकवाड यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला नाही. मुख्यमंत्री कार्यालय व जिल्हा प्रशासनाने प्रोटोकॉल न पाळता राज्य सरकारने राजकारण केले असा आरोप कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी राजू देसले व कॉ. गायकवाड यांनी मानस कन्या अॅड. साधना गायकवाड यांनी केला.
अंत्यसंस्कार सुरू असताना प्रशासनाकडून या बाबतचा फॅक्स पाठवून काही काळ थांबण्याची विनंती करण्यात आली. पण गायकवाड कुटुंबीय व बाबूजींच्या कॉम्रेड अनुयायांनी तो नाकारून साध्या पद्धतीने अंत्यसंस्कार करून नंतर राज्य सरकारला धारेवर धरले. सोमवारी सकाळी कॉ. गायकवाड यांचे निधन झाले. ते स्वातंत्र्य सैनिक होते. गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ लढा, हैदराबाद मुक्ती संग्राम अशा
तिन्ही लढ्यात त्यांचे योगदान होते. तसेच ते विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्ष नेते होते. असे असताना या झुंजार, लढवय्या नेत्याचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार तसेच मानवंदना देण्यासंबंधी जिल्हा प्रशासन व मुख्यमंत्री कार्यालय यांना माहिती देण्यात आली होती. राज्य मंत्री दादा भुसे यांनी देखील या बाबत पाठपुरावा केला. मात्र त्यांच्या निधनाला २४ तास उलटूनही याबाबत कोणताही निर्णय घेतला गेला नाही. पार्थिव अंत्यविधी ठिकाणी पोहचत असताना शासकीय इतमामात अंत्यविधी होईल, थोडे थांबा, अधिकारी व यंत्रणा तासाभरात पोहचतील असा निरोप आल्याचे राजू देसले यांनी सांगितले. राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने उशिरा निर्णय घेतला, बाबूजींचा अवमान केला अशी भावना उपस्थित कॉम्रेड मंडळीत उमटली. गायकवाड कुटुंबीय देखील नाराज झाले. त्यामुळे शासनाच्या गौरवाची वाट न पाहता अंत्यविधी करण्यात आल्याचे साधना गायकवाड यांनी सांगितले. यावेळी राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.
लोकप्रतिनिधींनी फिरवली पाठ
कॉ माधवराव गायकवाड यांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी दिग्गज नेत्यांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली. बाबूजींच्या अंत्यसंस्कार प्रसंगी राष्ट्रवादी नेते शरद पवार, छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. पालकमंत्री गिरीश महाजन सोमवारी रात्री किंवा मंगळवारी पहाटे अंत्यदर्शन घेण्यासाठी येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. मात्र प्रत्यक्षात कोणीही मनमाड मध्ये आले नाही. खासदार हरिश्चंद्र चव्हाण, तालुक्याचे आमदार पंकज भुजबळ हे देखील अंत्यदर्शन व अंत्यविधीसाठी न आल्याने बाबूजी समर्थकांत नाराजी पसरली आहे.