म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
दिवाळीनंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश आमदार मुंबईत गेले असून, त्यांचा मुक्काम आता तेथेच असणार आहे. बुधवारी भाजप व राष्ट्रवादीच्या विधी मंडळाच्या नेतेपदाची बैठक होती. त्यासाठी भाजप व राष्ट्रवादीचे आमदार मुंबईला गेले. त्यानंतर शिवसेना व काँग्रेसच्या आमदारांची बैठकही होणार असल्यामुळे त्यांचे आमदारही मुंबईत असणार आहेत.
विधानसभा निवडणुकीचा २४ ऑक्टोबरला निकाल लागला. त्यानंतर दिवाळीसाठी व परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची दखल घेण्यासाठी आमदार जिल्ह्यातच होते. परंतु, आता विधीमंडळ नेतेपदाची निवड व सत्ता स्थापनेच्या घडामोडी वेगाने घडत आहे. त्यामुळे हे आमदार आता मुंबई सोडून जाणार नसल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेने ५०- ५० फॉर्म्युला सांगितल्यामुळे, महायुतीमध्ये सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीतील प्रमुख नेत्यांची संयुक्त बैठक झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत तूर्त तरी कोण बाजी मारतो, हे सांगणे आता घाईचे ठरणार आहे. रात्रीतून काय घडामोडी होतात हे महत्त्वाचे असणार आहे.
...
फरांदेचे वजन वाढले
भाजपच्या विधीमंडळ नेता निवडीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव ठराव करून निश्चित करण्यात आले आहे. या ठरावाच्या १० सूचकांमध्ये नाशिकच्या मध्य मतदार संघाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांचे नाव होते. त्यामुळे त्यांचे भाजपमध्ये वजन वाढल्याची चर्चा आहे.
...
सरोज अहिरेंचे कौतुक
राष्ट्रवादीच्या विधीमंडळ बैठकीत देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांचे अजित पवार यांनी विशेष कौतुक केले. त्याचप्रमाणे दिंडोरीच्या आमदारांचाही सत्कार करण्यात आला. तसेच इतर आमदार व जिल्ह्यातून सहा जागा निवडून आल्याबद्दलही यावेळी उल्लेख करण्यात आला.