म. टा. प्रतिनिधी, नाशिक
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यास आमचा सुरुवातीपासूनच पाठिंबा आहे. परंतु, हे आरक्षण देताना इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का लागू नये, या स्पष्ट भूमिकेचा पुनरुच्चार माजी उपमुख्यमंत्री आणि ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांनी शनिवारी नाशिकमध्ये केला. समितीच्या अहवालानंतर सरकार नेमकी काय भूमिका स्पष्ट करते, त्यानंतर या विषयावर बोलणे योग्य राहील असे सूचक विधानही भुजबळ यांनी केले.
भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी सकाळी राधाकृष्णन बी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. मराठा समाजाला आरक्षण हा राज्यात सध्या चर्चेचा मुद्दा आहे. आरक्षणाबाबत भुजबळ म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यास आमचा पाठिंबा आहे. परंतु, ओबीसींसाठी २७ ते ३० टक्के आरक्षण होते, त्यापैकी आता केवळ १७ ते १९ टक्केच शिल्लक राहिले आहे. या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी आमची भूमिका असून, ती सर्वच राजकीय पक्षांना मान्य आहे. मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या समितीचा अधिकृत अहवाल काय येतो, यापेक्षाही सरकार त्यावर काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे आहे. जर-तर च्या मुद्द्यांवर आज बोलण्यापेक्षा सरकारची भूमिका स्पष्ट झाली की त्यावर अधिक बोलता येईल, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.
-
बाळासाहेबांना आदरांजली
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त पंकज भुजबळ यांनी त्यांच्या नांदगाव मतदारसंघात होर्डिंग लावल्याने त्याकडे भुजबळ यांचे लक्ष वेधण्यात आले. पंकज यांनी मतदारसंघात अभिवादनाचे होर्डिंग लावले असतील, तर त्याने काय झाले. पंकज, समीर असेल, उध्दवजी किंवा राज ठाकरे असतील आमचे गेल्या अनेक वर्षांपासून कौटुंबीक संबंध आहेत. त्यामुळे ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना आदरांजली वाहण्याचे योग्य काम पंकज यांनी केले आहे. मी देखील तुमच्या माध्यमातून ठाकरे यांना आदरांजली वाहतो, असे भुजबळ म्हणाले.