म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
करोना विषाणू अर्थात, कोविड-१९ या महामारीने बलाढ्य देशांना घाम फोडला असताना नाशिक जिल्ह्यात मात्र गेल्या सात दिवसांत तब्बल ४७६ बाधित रुग्णांनी या विषाणूवर मात करून आपल्यावरील संकट पिटाळून लावले आहे. ११ मे रोजी पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ७२ होती, तर १२ मे रोजी एकाच दिवशी १६५ रुग्णांना घरी सोडण्यात आले. पुढे पाच दिवसांत ही संख्या वाढल्याने आतापर्यंत ४७६ रुग्णांनी करोनावर मात केली. परिणामी जिल्ह्यात 'करोना से डरो ना' अशी स्थिती निर्माण होऊन करोनामुक्तीस वेग आला आहे.
करोनाबाधितांची जगभर आणि देशभर वाढती संख्या पाहता नाशिक जिल्ह्यात संसर्ग पसरला, तर हॉस्पिटल्समधील बेड पुरतील का, अशी धास्ती प्रशासनासह सामान्य नागरिकांनाही वाटू लागली होती. मात्र, मध्यंतरी रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण वाढले, तरी १४ ते १८ दिवसांच्या उपचारांनी ते बरे होत असल्याच्या शुभवार्ता दिवसागणिक वाढत आहेत. नाशिक शहरासह मालेगाव आणि ग्रामीणमध्येदेखील रुग्ण बरे होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे. अशा बऱ्या होणाऱ्या रुग्णांना सुरुवातीला टाळ्या वाजवून डिस्चार्ज देण्यात आला. आता नव्याने काही लक्षणे नसलेल्या बाधित रुग्णांना घरीच क्वारंटाइन करण्यात येऊ शकते, तसेच आठ ते दहा दिवस उपचार घेऊन प्रकृतीत सुधारणा होणाऱ्या रुग्णांना घरी सोडता येईल, असे नवीन निर्देश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत.
उत्तम रोगप्रतिकारशक्ती, सकारात्मक विचार या बळावर अनेक रुग्ण बरे होऊ लागल्याने त्यांना घरी सोडण्याचा धाडसी निर्णय आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाकडून घेतला जात आहे. दि. १२ मे रोजी एकाच दिवशी सर्वाधिक १६५ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ७२ वरून २३७ पर्यंत पोहोचली. पुढील पाच दिवसांत ही संख्या २३७ वरून ५४८ पर्यंत पोहोचली आहे. गत पाच दिवसांत ३११ रुग्णांना हॉस्पिटल्समधून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
-
११ ते १७ मेदरम्यान डिस्चार्ज मिळालेले रुग्ण
-
दिनांक रुग्णसंख्या
११ मे - ७२
१२ मे - २३७
१३ मे - २९१
१४ मे - ४५९
१५ मे - ५३४
१६ मे - ५४०
१७ मे - ५४८
--
प्रकृती ठीक असलेल्यांना सोडता येऊ शकते हे अनुभवातून शिकायला मिळाले. केंद्र सरकारनेही एकूण अनुभव विचारात घेऊन तशा मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यामुळे अशा व्यक्ती करोनामुक्त नसल्या, तरी करोनाच्या धोक्यातून त्या बाहेर पडल्या आहेत असे नक्कीच म्हणता येईल.
-छगन भुजबळ, पालकमंत्री, नाशिक