म. टा. वृत्तसेवा, मालेगाव
पाकिस्तानातून कांदा आयात करणार नसल्याचे एमआयडीएचचे मुख्य सल्लागार आर. पी. गुप्ता यांनी रविवारी दाभाडी येथे स्पष्ट केले. गुप्ता यांच्यासह केंद्रीय पथकाने दाभाडी येथे कांदा उत्पादकांशी भेट घेतली. त्या वेळी शेतकऱ्यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. त्याला उत्तर देताना गुप्ता यांनी कांदा आयातीचे केंद्राचे कोणतेही धोरण नसल्याचे स्पष्ट केले. कांदा पिकाला समाधानकारक भाव मिळत असून, त्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथून आलेल्या केंद्रीय पथकाने रविवारी सायंकाळी उशिरा दाभाडी येथे भेट दिली. या वेळी पथकाने शेतकऱ्यांशी चर्चा करून कांदा पिकाची स्थिती जाणून घेतली. ग्राहक संरक्षण विभागाचे संचालक अभयकुमार, एमआयडीएचचे मुख्य सल्लागार आर. पी. गुप्ता, शेतकरी कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक पंकज कुमार आदींसह नाफेडचे निदेशक निखिल पठाडे, पणन मंडळाचे विभागीय अधिकारी बहादूर देशमुख, मालेगावचे विभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी अशोक पवार आदींचा पथकात समावेश होता. कांद्याला कवडीमोल भाव असताना पथक का आले नाही, पाकिस्तानातून कांदा आयात का केला जातो, असे प्रश्न पथकासमोर उपस्थित केले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण देवरे, प्रगत शेतकरी प्रमोद निकम, नीळकंठ निकम, दिलीप निकम, अमोल निकम, कृषी पर्यवेक्षक एम. आर. कोकंदे, कृषी सहाय्यक जी. एच. लकारे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.