म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (आयएफएससी) गुजरातमध्ये हलविण्याचा निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणे ते मुंबईत सुरू करावे अशी मागणी 'सीटू'चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी केली आहे.
कराड यांनी म्हटले आहे की, मोदी सरकारच्या निर्णयाचा सीटू तीव्र निषेध करीत आहे. आंतरराष्ट्रीय कामगार दिन व संयुक्त महाराष्ट्र दिनी पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र गुजरातमध्ये हलविण्याचा निर्णय घेऊन महाराष्ट्राच्या अस्मितेवर आणि आर्थिक शक्तीवर हल्ला केला आहे. जनता हे कधीच सहन करणार नाही. केंद्र सरकारने हा निर्णय रद्द करावा आणि पूर्वीप्रमाणे मुंबईत आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र सुरू करावे, अशी मागणी महाराष्ट्र सीटूच्या वतीने करण्यात आल्याचे कराड यांनी सांगितले.
..तर आंदोलन करू!
केंद्र सरकारने हा निर्णय रद्द न केल्यास 'सीटू' आणि अन्य कामगार संघटना तीव्र आंदोलन करतील असा इशारा कराड यांनी दिला. पंतप्रधान मोदी सत्तेवर आल्यापासून मुंबईला आर्थिक राजधानी म्हणून कमजोर करण्याचे कारस्थान गेली सहा वर्षे सातत्याने सुरू आहे. महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचे मोरारजी देसाई यांचे कारस्थान मराठी जनतेने मोठे बलिदान देऊन हाणून पाडल्यामुळे पंतप्रधान महाराष्ट्राबाबत भेदभाव करून सूड उगवीत आहेत काय, असा प्रश्न मराठी जनतेला पडला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.