म. टा खास प्रतिनिधी, नाशिक
राज्याचे ऊजामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या मुद्द्यांवरून ब्राह्मण समाजाला लक्ष्य केल्याने शहर आणि जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटले. ब्राह्मण समाजाने जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्तांना निवेदन देऊन राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. त्यांचे मंत्रिपद काढून घ्यावे तसेच आमदारकी रद्द् करावी अशी मागणीही निवेदनाद्वारे सरकारकडे करण्यात आली आहे.
समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटल्यानुसार डॉ. नितीन राऊत यांनी ब्राह्मण समाजावर खालच्या शब्दात टिका केली. ब्राह्मण समाज परदेशी असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे राज्यभर डॉ. राऊत यांच्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. राज्याचे मंत्री जाहीरपणे जातिवादाला खतपाणी घालत असल्याची भावना यामुळे जनमानसांत निर्माण झाली आहे. कोणताही मंत्री मंत्रिपदाची शपथ घेतो त्यावेळी कोणत्याही जातिधमार्चा अनादर करणार नाही, सर्व लोकांना समान वागणूक देईल अशी शपथ घेत असतो. डॉ. राऊत यांच्या वक्तव्याने संविधानातील शपथेच्या गोपनीय प्रथेलाच नख लागल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. राऊत यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. त्यांचे आमदारकीचे निलंबन करावे व त्यांना त्वरित अटक करावी अशी मागणी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, भगवंत पाठक, अॅड. भानुदास शौचे, हेमंत कुलकर्णी, तुषार जोशी यांनी केली आहे.