आघाडीतील नेत्यांचा आरोप
म. टा. वृत्तसेवा, मालेगाव
लोकसभा निवडणुकीत मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात मतटक्का घसरल्यावरून राजकारण सुरू झाले आहे. माजी आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल व जनता दल नेते बुलंद इक्बाल यांनी महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेसवर असलेला राग मतदारांनी मतदान न करून व्यक्त केल्याचे म्हटले आहे.
काँग्रेस आमदार असिफ शेख यांनी निवडणूक आटोपल्यानंतर मंगळवारी (दि. ३०) पत्रकार परिषद घेऊन निवडणूक व पोलिस यंत्रणेने जाणीवपूर्वक सरकारच्या दबावात मालेगाव मध्य मतदारसंघात मतदान कमी व्हावे यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. तसेच धुळे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात फेरमतदान घेण्याची मागणी करणार असल्याचे म्हटले होते. आ. शेख यांनी शिष्टमंडळासह धुळे येथील नायब जिल्हाधिकारी यांना फेरमतदान घेण्यासंबंधीचे गुरुवारी निवेदन दिले. यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेस प्रवक्ते साबीर गौर, मौलाना अहद असदी, अब्दुल कयूम, जमाल शेख, अब्दुल हाफिज अन्सारी, शकील शाह उपस्थित होते. आ. शेख यांनी मतदान कमी झाल्याचे खापर प्रशासनावर फोडले असतांना महापालिकेत विरोधात असलेले परंतु लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत गेलेल्या महागठबंधन आघाडीच्या नेत्यांनी मतटक्का घटल्याचे खापर काँग्रेसवरच फोडले आहे.
माजी आमदार इस्माईल व जनता दल व महागठबंधन आघाडीचे गटनेते बुलंद इक्बाल यांनी उर्दू मिडिया सेंटर येथे पत्रकार परिषद घेतली. आम्ही महापालिकेत काँग्रेसविरोधात असलो तरी लोकसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन नको म्हणून काँग्रेस उमेदवार कुणाल पाटील यांचे समर्थन केले. आमच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. मात्र, मतदानाचा टक्का घटण्यास महापालिकेत सत्तेत असलेली काँग्रेस कारणीभूत असल्याचा आरोप केला. शहरात रस्ते, स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य अशा मूलभूत सोयी सुविधा पुरवण्यात काँग्रेस अपयशी ठरते आहे. याविषयी असलेला राग मतदारांनी लोकसभा निवडणुकीत मतदान न करून काढला आहे, असा दावा दोन्ही नेत्यांनी केला आहे.