मालेगाव मालेगावी शिवभोजनथाळी केंद्रात प्रतिसाद !
म. टा. वृत्तसेवा, मालेगाव
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून २६ जानेवारीपासून राज्यभरात शिवभोजन थाळी केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यात नाशिक शहरानंतर मालेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. गेल्या १० दिवसात दोन ते अडीच हजाराहून अधिक लोकांनी या थाळी केंद्रावर जेवण घेतले आहे. शासनाच्या उपक्रमास दानशूर व्यक्तींची साथ मिळाल्याने खऱ्या अर्थाने मालेगावातील शिवभोजन थाळी केंद्र भुकेल्यांची भूक भागवीत आहे.
भुकेल्यांना केवळ १० रुपयात पोटभर अन्न मिळावे या उद्देशाने मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवभोजन थाळी योजनेचे वचन दिले होते. याची वचनपूर्ती राज्यात २६ जानेवारीपासून करण्यात येत आहे. मालेगाव शहरात यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.
शासनाकडून १५० थाळी मंजूर करण्यात आली असली तरी रोज येथे २५० ते ३०० भुकेल्यांना केवळ १० रुपयात पोटभर जेवण दिले जाते आहे. दाभाडी येथील साईश्रद्धा महिला बचत गटाद्वारे हे केंद्र चालवले जात आहे. जेवणाऱ्यांची रोजी नोंदणी होत असून, मोबाइल अॅपद्वारे माहिती शासनाकडे पाठवली जात असते.
जय आनंद ग्रुप झाले अन्नदाते
राज्यात इतर ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्रांवर गर्दीची शक्यता लक्षात घेऊन पोलिस बंदोबस्त द्यावा लागत आहे. परंतु मालेगावी कृषिमंत्री दादा भुसे यांनी पुढाकार घेत शासनाकडून १५० थाळी उपलब्ध असल्या तरी येथील जय आनंद ग्रुप या सामाजिक संस्थेला अन्नदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार ग्रुपने १५० थाळीच्या व्यतिरिक्त उर्वरित थाळीसाठी अन्नदान करण्यात पुढाकार घेतला आहे. त्यामुळे १५० लाभार्थीं पूर्ण झाल्यानंतर देखील या केंद्रावर त्याच १० रुपयात भुकेल्यांना जेवण दिले जात आहे. यासाठी ग्रुपचे पवन टिबडेवाल व पिंटू कर्नावट स्वतः केंद्रावर कार्यरत असतात.