कृषिमंत्री दादा भुसे यांचे प्रतिपादन
म. टा. वृत्तसेवा, मालेगाव
'राज्यात कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस, गारपीट असे वातावरण, अशा विविध कारणांनी राज्यातील शेतकरी दुष्टचक्रात अडकतो. या सर्व प्रश्नांवर मात करण्यासाठी कृषी विभागाचा सर्व विभागांशी समन्वय साधावा लागतो. शेतकऱ्यांना आनंदी व चिंतामुक्त करावयाचे ध्येय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आहे. आपण त्यासाठी कंबर कसली आहे. या कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर आपला भर असणार आहे,' असे प्रतिपादन कृषिमंत्री दादा भोसले यांनी केले.
मालेगाव शहर व तालुक्यातील विविध ज्येष्ठ नागरिक संघटनांतर्फे कृषिमंत्री दादा भुसे यांचा सत्कार रविवारी ज्येष्ठ नागरिक सभागृहात पार पडला. यावेळी भुसे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी. के. नागपुरे होते. भुसे म्हणाले,'मुख्यमंत्री ठाकरे यांचा शेतकरी हा जिव्हाळ्याचा विषय आहे. शेतकऱ्यांची दुःखे कायमचे नष्ट व्हावेत म्हणून उपाययोजना करण्याची जबाबदारी ठाकरे यांनी आपल्यावर सोपवली आहे. शेतकऱ्यांबरोबरच माजी सैनिकांच्या प्रश्नांची सोडवणूक आपणास करावयाची आहे. त्यासाठी विधायक सूचनांचे स्वागत करू.' ज्येष्ठ नागरिकांनी विधायक सूचना दिल्यास आपण त्यांचा विचार करू असेदेखील ते यावेळी म्हणाले.
यावेळी मालेगाव ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष डी. आर. हिरे, एस. एस. देवरे, पी. बी. कुलकर्णी, हरी सावंत, हरिदास आहिरे, गुलाबराव देसले, काळू सावंत, वाय. जी. अहिरराव, प्रभाकर वारूले, जगन्नाथ बच्छाव, पुरुषोत्तम ठाकूर, व्ही. आर. पाटील, श्यामकांत पाटील, वाय. व्ही. वाघ आदी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. पद्मा व्हवल, शालिनी डहाळे, नलिनी माळी, कमलाकर चौधरी, दत्तात्रय परचुरे, आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान बागुल यांनी केले. निंबा सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. तर आभार सुखदेव देवरे यांनी मानले.