फोटो - पंकज चांडोले
- -
उद्योजकतेतून मिळेल स्वत:ची ओळख
उद्योजक सोमनाथ राठी यांचे प्रतिपादन
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
विद्यार्थ्यांनी बदलत्या काळानुसार करिअरची दिशाही बदलणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी नोकरी मिळविण्यात वेळ घालविण्यापेक्षा उद्योजकतेकडे वळायला हवे. उद्योजकतेत नावीन्यपूर्ण कल्पना आणि आविष्कारांच्या बळावर स्वत:ला सिध्द करावे. जेणेकरुन स्वत:ची ओळख प्राप्त होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन उद्योजक सोमनाथ राठी यांनी केले.
गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित बीवायके कॉलेजमध्ये ६१वा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कॉलेजच्या प्रांगणात शुक्रवारी हा सोहळा पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उद्योजक राठी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसावी होते. देशाच्या विकासासाठी तरुणांनी उद्योजक होणे गरजेचे आहे. बीवायके कॉलेजने अनेक नामवंत उद्योजक राज्यासह देशाला दिले आहेत. हा वारसा असाच चालू ठेवणे विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे, असे ते म्हणाले. यावेळी बीवायके कॉलेजचे प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, डॉ. बी. बी. गाडेकर, डॉ. आर. पी. देशपांडे, विद्यार्थी आदींची उपस्थिती होती.
- - -