म. टा. प्रतिनिधी, नाशिक
लॉकडाउनच्या काळात वनांमध्ये गस्त घालणे, वणवा रोखणे, वन्यजीवांचे संवर्धन, तस्करीच्या आव्हानाला सामोरे जात असतानाच पूर्वपावसाळी कामे करण्यातही वन विभागाची यंत्रणा दंग आहे. संचारबंदी असली, तरी सुरक्षित वावर राखून वनराईत चर खोदणे, छटाई आणि वृक्ष लागवडीसाठी खड्डे तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे गतवर्षी वृक्ष लागवडीत अव्वल ठरलेल्या नाशिक विभागाने यंदाही वनराईचा ध्यास जोपासल्याचे अधोरेखित होत आहे.
दर वर्षी एप्रिल-मे महिन्यात वन विभागातर्फे राखीव वनक्षेत्रासह वृक्ष लागवड प्रकल्पाच्या ठिकाणी करण्यात येणारी पूर्वपावसाळी कामे यंदाही सुरू आहेत. नाशिक वनवृत्तातील पूर्व व पश्चिम विभागासह सामाजिक वनीकरणतर्फे कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या सहाय्याने वनमजूर आणि स्थानिकांच्या पुढाकारातून जलसंधारणासह वनसंवर्धनाची कामे करण्यात येत आहेत. रोपवाटिकेत वृक्ष लागवडीसाठी विविध प्रजातींची लाखो रोपे तयार झाली असून, त्यांची निगा राखण्याचे काम सुरक्षित वावर ठेवून करण्यात येत आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे पूर्वपावसाळी कामांसाठी एप्रिलच्या प्रारंभी मजुरांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, समुपदेशनानंतर मजुरांची भीती दूर झाली असून, मास्क, ग्लोव्हज वापरून कामे करण्यात येत आहेत. पूर्व विभागात नांदगाव, कळवण, ननाशी, तर पश्चिम विभागात सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये कामे सुरू आहेत. शिसव, करंज, सीताफळ, आंबा, जांभूळ यांसारख्या विविध प्रजातींची रोपे तयार झाली आहेत.
यंदा कोणतेही 'टार्गेट' नाही
राज्य शासनातर्फे वृक्ष लागवडीसंदर्भात यंदा 'टार्गेट' देण्यात आलेले नाही. मात्र, नाशिक वनवृत्तातील कामे अंतिम टप्प्यात आली असून, पावसाळ्यात लागवड करता येईल. गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीमध्ये हजारो रोपांचे नुकसान झाले असले, तरी डिसेंबरनंतर रोपे तयार करण्याचा वेग पुन्हा वाढला आहे. गावपातळीवर चर खोदण्यासह वनराईतील छटाईदेखील करण्यात येत आहे. १५ मेपर्यंत पूर्वपावसाळी कामे पूर्ण होतील, असे उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनी सांगितले.
- -
\Bदहा टक्के कामे बाकी\B
मार्च महिन्यातच पूर्वपावसाळी कामे सुरू झाली. मात्र, करोना व लॉकडाउनमुळे मजुरांची संख्या कमी करावी लागली आहे. ठराविक संख्येतच कामे पूर्ण करण्यात येत आहेत. ऑक्टोबरपासून रोपे तयार करण्याची कामे करण्यात आली. सध्या मशागत, खड्डे तयार करण्यासह डोंगराळ भागात विशेष लक्ष देण्याचे काम सुरू आहे. अवघी दहा टक्के कामे राहिली असून, मजुरांची काळजी घेत असल्याचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी सांगितले.