म. टा. प्रतिनिधी, नाशिक
'दादा, लॉकडाउन कधी संपेल हो, होस्टेलमध्ये कसेबसे दिवस काढतोय. जवळचे पैसेही संपलेत, मित्रांच्या डब्यात जेवून दिवस काढतोय. घरून कुणालाही पैसे पाठविणे शक्य नाही. खूप निराश होत चाललो आहे. काय करू?' हा उद्विग्न सवाल आहे शहरातील एका वसतीगृहातल्या विद्यार्थ्याचा. या विद्यार्थ्याची कहानी कानावर पडताच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या जेवणाच्या डब्यापासून तर या तरुणास नगर जिल्ह्यातील त्याच्या गावी जाण्यापर्यंतची सर्व व्यवस्था करून त्याला सुखरूप घरी पोहोचविले.
शहरातील कॉलेजरोडवरील एका वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्याने अभाविपच्या हेल्पलाइनवर काही दिवसांपूर्वी फोन केला. या फोनद्वारे त्या विद्यार्थ्याने लॉकडाउनमधील आपबिती व मनातील नैराश्याचे विचार कार्यकर्त्यांजवळ व्यक्त केले. त्याची गांभीर्याने दखल घेत कार्यकर्त्यांनी वसतीगृहाकडे धाव घेत या विद्यार्थ्याची आस्थेने विचारपूस केल्यानंतर त्याची परिस्थिती नाजूक असल्याचे लक्षात आले. नगर जिल्ह्यातील मूळ श्रीरामपूर नजीकचा रहिवासी असणाऱ्या विद्यार्थ्याच्या पालकांची त्याला या कसोटीच्या प्रसंगीही पैसे पाठविण्याची परिस्थिती नव्हती. बाहेर सर्वत्र असणारे लॉकडाउन, जवळचे पैसे संपलेले, ज्या मित्रपरिवाराच्या आधाराने रोज जगतो ते वसतीगृहही सुनेसुने झालेले. या स्थितीत विद्यार्थ्याचा एकांतवास आणि नैराश्यात दिवसेंदिवस भर पडू लागली होती. दरम्यान, अभाविपच्या हेल्पलाइनसंदर्भात समजताच त्याचे संपर्क केल्यानंतर त्याची चौकशी करीत कार्यकर्त्यांनी त्याला जेवणाचा डबा पोहोचविण्यासोबत धीराचे शब्दही दिल्याने त्याचा हुंदका फुटला. या विद्यार्थ्याला इ-पास मिळवून देण्यासाठी सर्व प्रक्रिया आस्थेने पार पाडतानाच त्याची वैद्यकीय चाचणी व घरी परतण्याची सर्व व्यवस्था करून देत त्याला शहरातून निरोप दिला. या विद्यार्थ्याला नुकतेच नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे पोहोचविण्यात आल्यानंतर त्याला निरोप देणारे कार्यकर्तेही भारावले होते.
-----
संघटनेच्या माध्यमातून लॉकडाउनच्या काळात विविध सामाजिक उपक्रम सुरू आहेत. यातील विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन असणाऱ्या एका उपक्रमासही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मूळच्या श्रीरामपूर येथील विद्यार्थ्याला नुकतीच घरी पोहोचविण्यात मदत करताना कार्यकर्त्यांना लाभलेले समाधान स्मरणात राहील.
- सागर शेलार, जिल्हा संयोजक, अभाविप