भुजबळ, थोरात यांची नाशिकमध्ये टीका
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
हिंमत असेल तर पुन्हा निवडणुका घ्या, असे आव्हान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्यानंतर त्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. नाशिक येथे वकील परिषदेच्या कार्यक्रमाला आलेले नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी फडवीस यांच्यावर जोरदार टीका केली. फडणवीस सत्तेत नसल्याने अस्वस्थ झाल्याचे सांगतानाच सरकार पडणार नाही. कुणी ते पाडण्याचा प्रयत्न केला तरी ते जमणार नाही, असेही उभय नेत्यांनी सांगितले.
भुजबळ म्हणाले, की सरकारमध्ये नाही ही गोष्ट फडणवीसांना अस्वस्थ करीत आहे. त्यांनी दोन एक वर्षे वाट बघावी, सरकार नीट काम करते आहे का? ते बघावे. मग टीका करावी. राज्याचे माजी मुख्यमंत्री असूनही त्यांचे मन छोटे आहे. हा काही कुस्तीचा आखाडा नाही, एकेक बघून घ्यायला, असा टोलाही त्यांनी लगावला. भुजबळ यांनी यावेळी भाजपवरही टीका केली. याअगोदर भाजपने सुद्धा ३० -४० पक्षांनी एकत्र घेऊन सरकार बनवलेच ना? काश्मीरमध्ये काय केले? ज्यावेळेस आवश्यकता असते. तेव्हा पक्ष एकत्र येत असतात. एवढा त्रागा करून घेण्याचे कारण नाही. त्यांच्यावर विरोधी पक्षाची जबाबदारी आहे ती त्यांनी पार पाडावी, असा टोला भुजबळ यांनी लगावला.
महसूल मंत्री थोरात म्हणाले, की अनेक माजी मुख्यमंत्री पाहिले. पण, अशी अस्वस्थता मी बघितली नाही. फडणवीस फारच अस्वस्थ आहे. ते बोलतात ते कधी खरे होत नाही. त्यामुळे सरकार पडणार नाही. पाच वर्षे ते टीकेलच.