म. टा. वृत्तसेवा, निफाड
पालखेड धरण भरल्याने गेल्या १५ दिवसांपासून पालखेड डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. कालव्यास प्रमाणापेक्षा जास्त पाणी सोडल्याने डोंगरगाव जवळ कालवा फुटण्याचा संभव असल्याने निदर्शनास येताच नागरिकांनी ही बाब पाटबंधारे विभागाला कळविली. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले असून, दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
नाशिक पूर्व भागात जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने नाशिक, दिंडोरी तालुक्यातील धरणे भरली आहेत. त्यामुळे कालव्यांद्वारे पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे. मात्र कालव्यांना प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात पाणी सोडल्याने कालवा भरून वाहत असल्याने बऱ्याच ठिकाणी कालवा फुटण्याच्या स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतातील मका, सोयाबीन, द्राक्ष बागा, भुईमुग, बाजरी यासारखी पिके सडू लागली आहेत. पाटबंधारे विभागाने अपघाताची वाट न पाहता कालव्याच्या पाण्याचा विसर्ग कमी करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
.