मंगळवारपासून अंमलबजावणी; ग्रामस्थांच्या रोजगारासही हातभार
....
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर किल्ल्यावर जाण्यासाठी मंगळवार (१५ ऑक्टोबर) पासून शुल्क आकारण्यात येणार असून, संकलित होणारा निधी किल्ल्याच्या संवर्धनासाठी वापरला जाणार आहे. किल्ला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यासाठी वनविभाग प्रयत्न करीत असून, तेथील ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठीही उपाययोजना आखण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास अहिरे यांनी दिली.
हरिहर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हर्षेवाडी येथील वनव्यवस्थापन समितीने किल्ल्याच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. अडीचशे कुटुंबांचे या पाड्यावर वास्तव्य असून, हरिहर किल्ल्यावर सुटीच्या दिवशी होणारी गर्दी विचारात घेता उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी पुण्यातील एका सामाजिक संस्थेने हरिहर किल्ल्यावर स्वखर्चातून दरवाजा बसविण्याची मागणी केली होती. मात्र, किल्ल्याच्या मूळ सौंदर्याला बाधा येईल म्हणून परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे वनविभागाने आता स्वत: या किल्ल्याच्या संवर्धनाचा वसा हाती घेतला असून, किल्ल्यावर जाण्यासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येणार आहे. यातून संकलित होणारा निधी किल्ल्याची डागडुजी आणि तेथील राखीव वनक्षेत्राच्या विकासासाठी वापरण्यात येणार आहे. त्यासाठीचा विशेष अहवाल वनविभागाने तयार केला असून, पुरातत्व विभागाला पाठविण्यात आला आहे. महाराष्ट्रासह या ठिकाणी कर्नाटक, केरळ, गोवा या राज्यांतून अभ्यासू पर्यटक येत असल्याच्या नोंदी समितीने घेतल्या आहेत. किल्ल्यावर तरुणाईची हुल्लडबाजी थांबावी आणि पर्यटकांना आनंद लूटता यावा त्यासाठी हर्षेवाडीत खोली, जेवण आणि चहा-नाश्त्याची सोय उपलब्ध केली जाणार आहे. या माध्यमातून पर्यटकांच्या सोयीसह ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
...
गाइड नेमणार
हरिहर किल्ल्यावर हिवाळ्यात विकेंडला एक ते दीड हजार पर्यटक येत असल्याच्या नोंदी समितीकडे आहेत. या पर्यटकांना किल्ल्याच्या इतिहासाची आणि राखीव वनक्षेत्राची संपूर्ण माहिती मिळावी, तसेच त्या ठिकाणी सुरक्षा, स्वच्छता आणि संवर्धन राखले जावे म्हणून गाइड नेमण्यात येणार आहेत. वनविभागातर्फे हर्षेवाडीतील युवकांना प्रशिक्षण दिले जाणार असून, ते युवक पर्यटकांना माहिती देतील. त्यातून युवकांना रोजगार देण्याचा प्रयत्न असल्याचे वनविभागाने सांगितले.