निफाडमध्ये गुरुवारी होणार ऊस-कांदा-द्राक्ष परिषद
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
कांद्याचे भाव गडगडले आहेत. निर्यातदार एक क्विंटल द्राक्षांमागे शेतकऱ्यांकडून सात किलो द्राक्षांची कपात करतो. तर गतवर्षी बाहेरील कारखान्यांना पुरविलेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांना अजून मिळू शकलेले नाहीत. सरकार या प्रश्नांवर मूग गिळून गप्प आहे. त्यांची धोरणे या पिकांना आणि शेतकऱ्यांनाही मारक असून या विरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. गोदा-कादवा ऊस, कांदा, द्राक्ष परिषदेत शेतकरी याबाबतचा गुरुवारी (दि. २७) ठराव करतील, अशी माहिती संघटनेने दिली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अशा प्रकारची पहिलीच परिषद निफाड तालुक्यातील करंजगाव येथे गुरुवारी (दि. २७) सायंकाळी सहा वाजता होणार आहे. त्यामध्ये खासदार राजू शेट्टी, स्वाभिमानीचे प्रांताध्यक्ष डॉ. प्रकाश पोपळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेची माहिती देण्यासाठी सरकारी विश्रामगृहावर सोमवारी पत्रकार परिषद झाली. यावेळी स्वाभिमानीचे प्रदेश युवाध्यक्ष हंसराज वडघुले, जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल, राज्य प्रवक्ते संदीप जगताप, साहेबराव मोरे, सोमनाथ बोराडे, नितीन रोटे आदी उपस्थित होते.
यावेळी वडघुले म्हणाले, की शेतकरी एक ना अनेक समस्यांना तोंड देत असून सरकारला त्यांच्याशी घेणे-देणे नाही. निफाडमध्ये गेल्यावर्षी २० लाख मेट्रिक टन ऊसाचे उत्पादन झाले. निफाड आणि रानवड सहकारी साखर कारखाना बंद असल्याने हा ऊस बाहेर पाठवावा लागला. परंतु, अजूनही अनेक शेतकऱ्यांना या उसाचे पैसे मिळाले नाहीत. हे कारखाने सुरू करण्याबाबतची निविदा प्रक्रिया अडखळत सुरू आहे. कांद्यासह भाजीपाल्याला भाव नाही. त्यामुळे तो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. द्राक्ष बागायतदारांची लुबाडणूक आणि फसवणूक होत असताना सरकार त्यावर बोलण्यास तयार नाही. या सर्व पार्श्वभूमीवर ही परिषद घेण्यात येणार आहे.
असे होणार ठराव
निफाड आणि रानवड साखर कारखान्यात ऊस गाळप सुरू करण्यात यावे, मागील वर्षीच्या 'एफआरपी'प्रमाणे राहिलेले पेमेंट मिळावे, विविध कार्यकारी सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना थेट कर्च पुरवठा करावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हमीभाव मिळावा आदी मागण्यांसह काही महत्त्वाचे ठराव त्यामध्ये शेतकरी करणार आहेत.
राज्य परिषदांची पायाभरणी
करंजगाव ग्रामपंचायतीसमोर सायंकाळी सहाला ही परिषद होणार आहे. तत्पूर्वी, खासदार राजू शेट्टी सकाळी ११ वाजता ताहाराबाद व नामपूर येथील बाजार समित्यांना भेट देणार आहेत. बागलाण तालुक्यातील उत्राणे येथे दुपारी एक वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. राज्यभरात होणाऱ्या परिषदांची पायाभरणी येथून होईल, अशी माहीती वडघुले यांनी दिली.