चांदोरी, सायखेडा परिसराला वेढा कायम, नागरिक सुरक्षितस्थळी
म. टा. वृत्तसेवा, निफाड
शनिवार व रविवारी गोदावरी नदीला पूर आल्याने सायखेडा, चांदोरीसह गोदाकाठावरील गावांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी सकाळपासून पुराचे पाणी कमी झाले असले तरी नाशिक-औरंगाबाद मार्गावरील सायखेडा व चांदोरी चौफुली परिसरात पाणी असल्यामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीतच होते.
शनिवार आणि रविवारी गोदावरी नदीला आलेला महापूर आणि नांदूरमध्यमेश्वरमधून झालेला पाण्याचा विसर्ग यामुळे गोदाकाठावरील चांदोरी, सायखेडा ही गावे पाण्याच्या वेढ्यात अडकली आहेत. सोमवार सकाळपासून पावसाचे प्रमाण कमी झाले. मात्र पुराचे पाणी ओसरण्यास अद्याप वेळ असल्याने जनजीवन विस्कळीतच होते. सोमवारी निफाड येथील शनी मंदिर, मेनरोड व बसस्थानक परिसरात पाणी साचलेले होते. चांदोरी येथील ९०० लोकांना विविध लॉन्समध्ये सुरक्षितस्थळी ठेवण्यात आले आहे.
मदतकार्य सुरू
पूर परिस्थितीमुळे स्थलांतरित झालेल्या नागरिकांना सर्व पक्षातील नेते व कार्यकर्ते गट-तट विसरून मदत करीत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यासह चांदोरीतील सर्व मित्रमंडळे आणि सामाजिक संस्था या सामाजिककार्यात रविवार सकाळपासून सहभागी झाले होते.
५२ लोकांची सुटका
सायखेडा येथे भेंडाळी चौफुलीजवळ पुराच्या वेढ्यात अडकलेल्या ५२ लोकांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. एचडीआरएफ, जीवरक्षक दलाचे जवान व पोलिसांच्या पथकाने हे बचाव कार्य केल्याची माहिती तहसीलदार दीपक पाटील यांनी दिली. सायखेड्याला पुराचा वेढा अजूनही कायम आहे. मार्केट कमिटी, गंगानगर परिसर, चाटोरी चौफुली येथे पुराचे पाणी आहे.
अखंख्य हात मदतीसाठी
या पुराच्या वेढ्यात अडकलेल्या सुमारे एक हजार नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. या सर्वांना राजकीय पक्ष, सामाजिक संस्था यांच्याकडून खाद्यपदार्थ पुरविण्यात आले आहे. सायखेडा येथील पूरग्रस्त नागरिकांना लासलगाव येथील शिवसेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच क्रांती मित्र मंडळ यांच्या विद्यमाने रविवारी रात्री सायखेडा येथील जिल्हा परिषद शाळा, जनता इंग्लिश स्कूल, श्रीरंग मंगल कार्यालय अशा सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. या पूरग्रस्त कुटुंबांसाठी ला. म. को. बॅकेचे मॅनेजर राजाराम रसाळ यांनी भोजनाची व्यवस्था केली. क्रांती मित्र मंडळाने अल्पोहारासह फळांची व्यवस्था केली. या उपक्रमात लासलगाव येथील सेनेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, क्रांती मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे.